Nhavare News : न्हावरे गावात 4 वाहनांचा विचित्र अपघात; अवैध पार्किंग आणि गतिरोधकाचा मुद्दा ऐरणीवर
Nhavare News : शिरुर-चौफुला महामार्गावरील न्हावरे गावच्या चौकात गुरुवारी चार वाहनांचा विचित्र अपघात घडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

Nhavare News : शिरुर-चौफुला मार्गावरील न्हावरे गावच्या चौकात चार वाहनांचा विचित्र अपघात झाल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे न्हावरे चौकातील रस्त्याच्या कडेला होणारी बेशिस्त आणि अवैध वाहन पार्किंग तसेच या रस्त्याला गतिरोधक नसल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. (Nhavare News)
न्हावरे गावचा मुख्य चौक हा शिरुर-चौफुला मार्गावरील महत्त्वाचा वर्दळीचा परिसर आहे. या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. त्यातच चौकाच्या परिसरात रस्त्याच्या कडेला दुचाकी तसेच चारचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे उभी केली जात असल्याने रस्त्याची प्रत्यक्ष रुंदी कमी होत आहे. परिणामी समोरून येणाऱ्या वाहनांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असून, वळण घेताना तसेच चौक ओलांडताना वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. (Nhavare News)
याच पार्श्वभूमीवर चार वाहनांचा विचित्र अपघात घडल्याने ‘अवैध पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आणखी किती अपघात घडल्यावर संपणार…?’, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी एखाद्या गंभीर अपघाताची प्रशासन वाट पाहत आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. (Nhavare News)
विशेष म्हणजे, वाहतूक कोंडी आणि अपघाताची शक्यता निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे अधिकार आणि यंत्रणा असतानाही प्रत्यक्षात कठोर कारवाई होताना दिसत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. काही वाहनचालक रस्त्यालगत वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत असल्याने पादचारी, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Nhavare News)
न्हावरे चौकातील अवैध पार्किंगला आळा घालण्यासाठी प्रशासनाने केवळ अपघातानंतर हालचाल न करता कायमस्वरूपी वाहतूक नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा आज किरकोळ स्वरूपात घडलेला अपघात उद्या मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून बेशिस्त पार्किंगवर कारवाई करावी आणि न्हावरे चौकातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी वाहनचालक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे. (Nhavare News)





