Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप! ठाकरेंच्या 4 आमदारांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट, 12 जण सोबत असल्याचा दावा
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात जाण्याच्या चर्चांनंतर आता पक्षातील आमदारांबाबतही राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात जाण्याच्या चर्चांनंतर आता पक्षातील आमदारांबाबतही राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ठाकरे गटातील चार आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतल्याची माहिती समोर येत असून, या आमदारांनी आणखी १२ आमदार आपल्या संपर्कात असल्याचे शिंदेंना सांगितल्याचा दावा करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन ते तीन दिवसांपूर्वी ही भेट झाल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे एकूण २० आमदार असून, पक्षफोडीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या दोनतृतीयांश संख्येसाठी १४ ते १५ आमदारांची गरज आहे. त्यामुळे संबंधित आमदारांनी आणखी काही काळाची मुदत मागितल्याचेही वृत्त समोर आले आहे.
दरम्यान, ‘ऑपरेशन टायगर ३.०’ या नावाने ठाकरे गटातील आमदारांना शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत १४ ते १५ आमदारांचा स्वतंत्र गट स्थापन करून ते ठाकरे गटापासून वेगळे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मात्र, एकनाथ शिंदे यांची भेट नेमक्या कोणत्या आमदारांनी घेतली, याबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात येत आहे. यापूर्वी खासदारांच्या संभाव्य पक्षांतराबाबत जशा चर्चा रंगल्या होत्या, त्याचप्रमाणे आता आमदारांच्या संभाव्य हालचालींवरही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
खासदारांच्या पक्षांतरानंतर आता आमदारांनीही साथ सोडल्यास ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
‘जे घडणार ते लवकरच समोर येईल’ : नरेश मस्के –
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना खासदार नरेश मस्के म्हणाले, “जे काही घडणार आहे, ते लवकरच सर्वांसमोर येईल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाच्या भूमिकांमुळे नाराज असून ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आहेत. कार्यकर्त्यांची कामे होत असल्याने अनेक जण शिंदे यांच्याशी जोडले जात आहेत. पक्षातील काही निर्णयांबाबत असलेल्या नाराजीमुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षाची साथ सोडत आहेत.”





