बंगळुरू – देशाला धार्मिक आधारावर विभाजित होण्यापासून वाचवणे आवश्यक असल्याने आगामी 2024च्या लोकसभा निवडणूकीत भाजपच्या विरोधात प्रादेशिक पक्षांनी एकत्र यावे. कारण हा प्रश्न भाजपचा नसून तो देशाचा प्रश्न आहे, असे आवाहन जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी केले.
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी “काश्मीर फाइल्स’ आणि “द केरळ स्टोरी’सारख्या चित्रपटांचा निषेध करत मोदी सरकारवर निशाणा साधला.
फारुख अब्दुल्ला म्हणाले, प्रत्येकाला माझा संदेश आहे की भारतात विविधतेत एकता आहे. आपण विविधतेचे रक्षण करूया. ते देशाच्या एकतेचे रक्षण करेल, असे म्हणत त्यांनी तिसऱ्या आघाडीच्या गरजेच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.