Prithviraj Chavan : प्रशांत किशोर यांच्या ऐतिहासिक विजयानंतर माजी मुख्यमंत्र्याचं मोठं वक्तव्य; म्हणाले “भाजपला पराभूत करू शकेल…”
Prithviraj Chavan : किशोर यांच्या विजयानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.

Prithviraj Chavan on Prashant Kishor : बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत (Bankipur Assembly by-election) भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी या मतदारसंघातून तब्बल १८ हजार मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला.
भाजपच्या (BJP) प्रतिष्ठेला हा मोठा धक्का मानला जातो. या निवडणुकीचं विश्लेषण केले जात असून, कालपासून प्रशांत किशोर यांच्या विजयाविषयी चर्चा रंगली आहे. किशोर यांच्या विजयानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.
“लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा निकाल आहे, हा निर्णायक निकाल आहे. कधीही भाजप पराभूत झालेला नव्हता, तिथे प्रशांत किशोर विजयी झालेले आहेत, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. कोणता उमेदवार भाजपला पराभूत करू शकेल, त्याच्या पाठीशी मतदार उभे राहतात.” असं मोठं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
…कारण त्या आंदोलनात राजकारण आणायचे नव्हते.
जंतर मंतर येथील आंदोलनावर देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं. या आंदोलनाचे श्रेय त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. “विरोधी पक्षाची एकजूट कायम ठेवावी लागेल, आप-काँग्रेस दोघांनाही आम्हाला भाजपला सत्तेतून खाली खेचायचे आहे. युवकांचे आंदोलन होते, त्याचे क्रेडिट घेण्याचे प्रयत्न कोणी करू नये. काँग्रेस पक्ष त्यात २० तारखेनंतर उतरला, कारण त्या आंदोलनात राजकारण आणायचे नव्हते.” असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
एका जेष्ठ नेत्याने पंतप्रधानाची भेट घेण्यात गैर काय
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर विविध तर्क वितर्क बांधण्यात आले होते. या भेटीच्या राज्याच्या राजकारणात खमंग चर्चा रंगल्या होत्या. या भेटीवर देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं. “शरद पवार पंतप्रधान मोदींना का भेटले मी सांगू शकत नाही, त्यांनी म्हटलं त्यानुसार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भेटले असतील किंवा ट्विट केलं की विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर भेटले तसं असेल. मात्र, एका जेष्ठ नेत्याने पंतप्रधानाची भेट घेण्यात गैर काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
विजयानंतर प्रशांत किशोर काय म्हणाले?
देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहारमधील बांकीपूर विधानसभेवर जनसुराज पक्षाचा झेंडा फडकला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी विजय मिळवल्याने भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या ३० वर्षांपासून या मतदारसंघावर भाजपची पकड होती. तिथेच किशोर यांनी शिरकाव केला. विजयानंतर प्रशांत किशोर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले “बिहारला एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. पुढील ३ महिन्यात तुम्हाला बांकीपुर विधानसभा मतदारसंघात बदल दिसेल. जेव्हा आमच्याकडे काहीच नव्हते, तेव्हासुध्दा आम्ही बिहारसाठी आवाज उठवत होतो. आज तर आमच्याकडे आमचा एक हक्काचा आमदार आहे.”
Pawna Dam: पवना धरणातून विसर्गात मोठी वाढ! नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा






