कोयनानगर – पाटण तालुक्यातील मिरगाव येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या भूस्खलनानंतर, तेथील आपद्ग्रस्तांचे कोयनानगर येथे निवारा शेडमध्ये स्थलांतर करण्यात आले होते. त्यातील काही आपद्ग्रस्त पुन्हा मिरगावात येऊन राहिले आहेत. मुसळधार पाऊस पडत असूनही ते गावातच रहात असल्याने, त्यांचे पुन्हा निवारा शेडमध्ये सक्तीने स्थलांतर करावे, असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रशासनाला गुरुवारी दिला. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे चाफेर येथील साकव पूल वाहून गेल्याने तेथील बौद्धवस्तीचा संपर्क तुटला आहे. हा साकव पूल पुन्हा तयार करण्यासाठी सक्तीने भूसंपादन केले जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
गेल्या 24 तासांत कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मिरगाव येथे भूस्खलन झाले आहे. चाफेर या गावातील साकव वाहून गेला आहे. दरडग्रस्त मिरगाव व ओझर्डे येथील रस्ता वाहून गेला आहे. या भागाची पाहणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार रमेश पाटील, प्रभारी गटविकास अधिकारी मीना साळुंखे, कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नितिश पोतदार, मंडलाधिकारी संजय जंगम, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ शेलार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सावळाराम लाड, युवासेना तालुकाध्यक्ष अजय देसाई, भाजपचे नंदकुमार सुर्वे यांनी गुरुवारी पाहणी केली. त्यावेळी डुडी बोलत होते.
डुडी म्हणाले, चाफेर येथील साकव पूल वाहून गेल्याने संपर्कहीन झालेल्या बौद्धवस्तीसाठी प्रशासनाने पर्यायी रस्ता तयार केला आहे. त्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कंबर कसून काम केले. पावसाळा संपल्यानंतर तेथे पक्का साकव पूल बांधून देण्याची जबाबदारी माझी आहे. या पुलाला जागा देण्यासाठी कोणी मुद्दाम आडकाठी आणत असेल, तर सक्तीने भूसंपादन करून, तेथे साकव पुल उभारला जाईल. जिल्ह्यात “ऑरेंज अलर्ट’ असून, मिरगाव येथील आपद्ग्रस्तांचे कोयनानगर येथील निवारागृहात सक्तीने स्थलांतर करावे.
दोन वर्षांपूर्वी मिरगाववर दरड कोसळल्याने तेथील सर्व नागरिकांचे कोयनानगर येथे निवारा शेडमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. या निवारा शेडची आणि मिरगावची पाहणी डुडी यांनी केली. त्यावेळी काही आपद्ग्रस्त मिरगावात येऊन राहिल्याचे आढळले. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. स्थलांतरितांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रांमध्ये पाणी, वीज व अन्य नागरी सुविधा देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात जिल्ह्याला “रेड’ किंवा “ऑरेंज अलर्ट’ देण्यात येईल, त्या प्रत्येक वेळी दरडप्रवण व धोकादायक गावांमधील नागरिकांना तातडीने निवारा केंद्रांमध्ये हलविण्याची कार्यवाही स्थानिक प्रशासनाने करावी, असा आदेशही त्यांनी दिला.
वापराविना पडून असलेल्या वसाहतींचा अहवाल द्यावा
कोयनानगर येथे दरडग्रस्तांसाठी उभारण्यात आलेली निवारागृहे कमी पडत आहेत. कोयना प्रकल्पाच्या वसाहतीत दरडग्रस्तांसाठी अजून निवारागृहे उभारता येतील का, याचा विचार सुरू आहे. वापराविना पडून असलेल्या वसाहतींचा अहवाल तातडीने द्यावा, असे निर्देशही डुडी यांनी कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नितिश पोतदार यांना दिले.