नोकरीसाठी रशियात गेलेल्या 91 भारतीय युवकांची जबरदस्तीने लष्करात भरती; युद्धामुळे 8 जणांना गमवावे लागले प्राण

नवी दिल्ली – नोकरीसाठी रशियात गेलेल्या भारतीय युवकांना जबरदस्तीने रशियन सैन्यात भरती केले जात असून त्यांना युक्रेन बरोबरच्या युद्धात जुंपण्यात आले आहे. या विषयावर आज संसदेत चर्चा झाली. त्यावर उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी सांगितले की, सरकार रशियन सैन्यात भरती झालेल्या ६९ भारतीयांच्या सुटकेची वाट पाहत आहे आणि अनेक प्रकरणांमध्ये भारतीय युवकांची दिशाभूल झाल्याचे संकेत आहेत असे त्यांनी मान्य केले.
ते म्हणाले की, रशियन सैन्यात भारतीय नागरिकांची भरती झाल्याची एकूण ९१ प्रकरणे आहेत. त्यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला आहे, १४ जणांना डिस्चार्ज किंवा परत पाठवण्यात आले आहे आणि ६९ नागरिकांच्या सुटकेची प्रतीक्षा आहे, असे जयशंकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
ते म्हणाले की आम्ही हा मुद्दा अतिशय गांभीर्याने घेतो. मी स्वतः रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांकडे हा मुद्दा अनेकदा मांडला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत झालेल्या भेटीतही हा मुद्दा उपस्थित केला होता असे त्यांनी नमूद केले.
मंत्री म्हणाले की समस्या अशी आहे की रशियन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या भारतीय नागरिकांनी रशियन सैन्यासोबत सेवांसाठी करार केला आहे. तथापि अनेक प्रकरणांमध्ये भारतीय युवकांची दिशाभुल करण्यात आली आहे. ते दुसऱ्या नोकरीसाठी रशियात गेले होते पण त्यांना लष्करात भरती करून युद्धात जुंपण्यात आले आहे.
जयशंकर म्हणाले की, रशियन सैन्याच्या सेवेत असलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला डिस्चार्ज करून सोडण्यात येईल, असे आश्वासन पुतीन यांनी मोदींना दिले आहे अशी माहितीही त्यांनी दिली.





