शिवसेनेचा कोतवाली पोलीस ठाण्यावर मोर्चा
नगर – माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्याविरुद्ध राजकीय हेतूने खोटा गुन्हा दाखल केला आहे. या खोट्या गुन्याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. तो गुन्हा मागे घ्यावा, अशा मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने कोतवाली पोलीस ठाण्यावर सोमवारी (दि.19) रोजी सकाळी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी गुन्ह्याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासना नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, भाजपचे माजी शहराध्यक्ष अभय आगरकर, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, अनिल बोरुडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या बुरूडगाव परिसरातील काही लोकांची जमिनीचा वाद सुरू आहे.
या जमिनीच्या वादातून एका कुटुंबाने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ती जमीन त्यांच्या भावाच्या नावाने आहे. त्याच्याशी भगवान फुलसौंदर यांचा कोणताही संबंध नसल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.घटनेच्या दिवशी ते घटनास्थळी नव्हते. तरीही विनाकारण त्यांचे नाव गुन्ह्यात गोवले गेले. फुलसौंदर यांचे राजकीय आयुष्य उद्धवस्त करण्यासाठी त्यांच्या विरोधात खोटा गुन्हा राजकीय सूडबुद्धीने दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.