नवी दिल्ली : पाण्याच्या महत्त्वाविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि त्यांना सर्वोत्तम पाणी वापर पद्धती अवलंबण्यास प्रवृत्त करण्यासाठी, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे आयोजन केले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज मंगळवारी पुरस्कार वितरण करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील पुणे, यवतमाळ आणि बुलढाणातील संस्थांना उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय जलशक्ति मंत्री सी.आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात नऊ विविध श्रेणींमध्ये एकूण ३८ पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारांची घोषणा १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी करण्यात आली होती. सर्वोत्कृष्ट राज्याच्या श्रेणीत ओडिशा पहिल्या क्रमांकावर राहिले, तर उत्तर प्रदेश दुसऱ्या आणि गुजरात व पुद्दुचेरीने संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले. पुण्यातील भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन या संस्थेला सर्वोत्कृष्ट नागरी संस्थांच्या श्रेणीत पहिले स्थान प्राप्त झाले. यासोबत, पुणे महानगरपालिकेला सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या श्रेणीत तिसरे पारितोषिक देऊन यावेळी गौरवण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील रेमंड यूको डेनिम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सर्वोत्कृष्ट उद्योगाच्या श्रेणीत तिसरे पारितोषिक मिळाले. सर्वोत्कृष्ट नागरी संस्थांच्या श्रेणीत, नाशिकच्या युवा मित्रा, मित्रांगन कॅम्पस या संस्थेला द्वितीय पुास्काराने सन्मानित करण्यात आले, तर, सर्वोत्कृष्ट पाणी वापरकर्ता संघटनेच्या श्रेणीत, बुलढाणाच्या पेंटक्ली प्रोजेक्ट युनियन ऑफ वॉटर युजर असोसिएशनला प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाण्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट पाण्याच्या महत्त्वाविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि त्यांना सर्वोत्तम पाणी वापर पद्धती अवलंबण्यास प्रवृत्त करणे हे राष्ट्रीय जल पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे. सर्वोत्कृष्ट राज्य, सर्वोत्कृष्ट जिल्हा, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था, सर्वोत्कृष्ट शाळा किंवा महाविद्यालय, सर्वोत्कृष्ट उद्योग, सर्वोत्कृष्ट पाणी वापरकर्ता संघ, सर्वोत्कृष्ट संस्था (शाळा किंवा महाविद्यालयाव्यतिरिक्त), आणि बेस्ट सिव्हिल सोसायटी या नऊ श्रेणींमध्ये पाचवे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील, केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री.व्ही.सोमण्णा व राजभूषण चौधरी यांच्यासह राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (एनएमसीजी) जलशक्ती मंत्रालयाचे महासंचालक राजीव रंजन मिश्रा, पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या सचिव विनी महाजन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाच्या सचिव देबश्री मुखर्जी मंचावर उपस्थित होत्या.