औरंगाबाद – विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युती होणार आहे. त्यासाठी जागांचा 50-50 टक्के हा फॉर्म्युला आधीच निश्चीत झाला आहे. त्यात आता कोणताहीं बदल होणार नाही असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की दोन्ही पक्ष प्रत्येकी 135 जागा लढणार असून 18 जागा मित्र पक्षांना सोडण्यात येणार आहेत. मराठवाड्यातील दुष्काळी कामांचा आढावा घेण्यासाठी ते येथे आले होते त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की हा फॉर्म्युला आधीच निश्चीत झाला आहे. त्यात आता बदलाला वाव नाही. मोदी लाट असतानाही औरंगाबादेत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आहे त्या विषयी विचारले असता ते म्हणाले की शिवसेनेचा पराभव शिवसेनेच्या माजी आमदारानेच केला आहे.
त्यांच्या पराभवाला सेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हेच जबाबदार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. दरम्यान भाजप आणि शिवसेना यांच्यात प्रत्येकी 135 मतदार संघ वाटून घ्यायचे ठरले असले तरी कोणत्या मतदार संघातून कोणता पक्ष लढणार याचा तपशील मात्र अजून जाहीर झालेला नाही. शिवसेनेला संधी देण्यासाठी भाजपला काही विद्यमान आमदारांच्या जागा सोडाव्या लागतील का? या प्रश्नाची विद्यमान आमदारांमध्ये चिंता कायम आहे.