मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम अद्याप सुरू झाला नसताना बेस्ट उपक्रमाच्या कामगार पतपेढीच्या निवडणुकीने राजकीय वातावरण तापवले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी हातमिळवणी करत १८ ऑगस्ट रोजी होणारी बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीमुळे मुंबईतील राजकीय समीकरणांना नवा आयाम मिळाला असून, येत्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने या घडामोडीकडे लक्ष लागले आहे. ‘मराठी माणसासाठी’ ठाकरे बंधू एकवटले – गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या राजकीय वाटचाली करणाऱ्या ठाकरे बंधूंनी ‘मराठी माणसाच्या हितासाठी’ एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आणि मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर उच्चस्तरीय पातळीवर हा निर्णय घेण्यात आला. या युतीमुळे बेस्टमधील कामगार संघटनांच्या सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. निवडणुकीचे महत्त्व – बेस्ट उपक्रमाच्या कामगार पतपेढीची निवडणूक ही केवळ आर्थिक व्यवहारांपुरती मर्यादित नसून, कामगार संघटनांच्या प्रभावाचे आणि बेस्टमधील राजकीय वजनाचे मोजमाप करणारी मानली जाते. या निवडणुकीत यश मिळवणारी संघटना बेस्टच्या कामगारांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करते. त्यामुळे शिवसेना (उद्धव) आणि मनसे यांच्या युतीने या निवडणुकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. महापालिका निवडणुकीची नांदी? राजकीय निरीक्षक या युतीकडे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण चाचणी म्हणून पाहत आहेत. शिवसेना (उद्धव) आणि मनसे यांच्यातील हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यातील मोठ्या राजकीय युतीचा पाया ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची ही शक्यता मुंबईच्या राजकारणात नवे वारे आणू शकते.या युतीच्या घोषणेनंतर दोन्ही पक्षांनी निवडणूक तयारीला वेग दिला आहे. बेस्टच्या कामगारांमध्ये युतीच्या या निर्णयाचे स्वागत होत असून, निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंतांचे पत्रक बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले की, बेस्ट उपक्रमाच्या कामगारांच्या पतपेढीची निवडणूक सोमवार दि 18 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर झालेली आहे. सोसायटी निवडणुकीत ज्या पॅनल ची सत्ता असते त्या कामगार संघटना बेस्ट उपक्रमात बलवान समजल्या जातात. महाराष्ट्रात सद्या ठाकरे ब्रँड चर्चेत आहे. मराठी च्या मुद्द्यावर एकत्र आलेले आणि मराठी अस्मितेचा स्वाभिमान असलेले दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास महापालिका च काय महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकतील अशी सर्वसामान्य लोकांची धारणा आहे. बेस्टचे बहुतांश कामगार पुढारी, युनियन चे पदाधिकारी बेस्ट च्या बाहेर शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून परिचित आहेत. तर कित्येक पदाधिकारी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत. बेस्ट पतपेढी ची निवडणूक म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची नांदी आहे. त्यामुळे बेस्ट मधील ठाकरे बंधू च्या युती ला फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे. बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुबंई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यामध्ये या युती बाबत मागील काही दिवसांपासून युती बाबत चर्चा सुरु होती. वरिष्ठांच्या आदेशानुसार दोन्ही नेत्यांनी निर्णय घेतल्याप्रमाणे आता बेस्टमधील प्रत्येक लढाई आता बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना एकत्रित लढणार आहे. मराठी माणसाचा रोजगार म्हणजे बेस्ट उपक्रम पण विद्यमान सरकार मधील पुढारी आणि त्यांची धोरण काही उद्योगपती ना बेस्ट आंदण देण्यासाठी असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे बेस्टमधील मराठी कामगार हद्दपार होतं चालला आहे. त्यामुळे बेस्ट मध्ये ठाकरे ब्रँड एकत्र येणं म्हणजे मराठी माणसाची एकजूट मोठया ताकदीने उभी राहणार यांत शंका नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांना उद्धव ठाकरे सरकारच्या काळात ग्रॅज्युएटी साठी मुंबई महापलिका प्रशासन नियमित मदत करत होतं, पण जून 2022 नंतर महायुती सरकार भाजप सतेत आल्या नंतर बेस्ट मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी वाढत चालली आहे. बेस्टचा स्व मालकीचा बसताफा कमी होत चालला आहे नवीन नोकर भरती नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. बेस्ट पतपेढी मध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्या बेस्ट कामगार सेनेची सत्ता आहे. मागील नऊ वर्षाच्या कालावधीत बेस्ट कामगार सेनेच्या संचालक मंडळाने केलेल्या कामगार कल्याणकारी कामामुळं कामगारांचा प्रचाराला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्यामुळे अजून ताकद वाढली आहे याचा पतपेढीच्या निवडणुकीत सकारात्मक परिणाम होणार यात शंका नाही.