Maharashtra weather update : अखेर राज्यातून मान्सूनची घरवापसी होणार

मुंबई : यंदाचा देशासह राज्यातही पावसाने मोठा हाहाकार उडविला. त्यातच अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ सक्रिय झाल्याने पावसाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चांगलाच जोर पकडला होता. परंतु आता अखेरीस राज्यातून मान्सूनची घर वापसी होणार अशी चिन्ह दिसत आहेत.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसात राज्यभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास पार पडणार आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास अलिबाग, अहिल्यानगर, अकोला, जबलपूर, वाराणसी आणि रक्सौल या मार्गांमधून होणार आहे. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात तिथे पावसाचे सावट असेल.
मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून मान्सूनचा पाऊस हळूहळू कमी होत असल्याची चिन्ह दिसून येत आहेत. मान्सूनच्या परतीच्या प्रवासामुळे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम प्रमाणात पाऊस जरी पडणार असला तरीही एकूणच राज्यात हवामान उबदार राहणार आहे.
यावर्षी ठरलेल्या वेळेच्या आधीच आठवडाभर सुरु झालेला नैऋत्य मौसमी पाऊस २४मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर दोन आठवड्या आधीच तो महाराष्ट्रात पोहोचला. जून आणि जुलै महिन्यांमध्ये पावसाची तीव्रता कमी होती.
मात्र ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या मुसळधारेमुळे आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रात तयार झालेले शक्ती चक्रीवादळ यामुळे मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबला होता. गुजरात आणि मध्यप्रदेश उत्तर-प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागांमधून पुढच्या २४ तासात पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.





