वाघोली – हवेली तालुक्यातील केसनंद येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केसनंद शाखेचे शाखाप्रमुख अनिल गायकवाड यांच्याकडून मनमानी कारभार चालवला जात असून त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी भाजप नेते सातव यांनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार निवेदनाद्वारे केली होती. याबाबतीत दैनिक प्रभातने देखील (दि. २२) रोजी वृत्त प्रसिध्द करून या प्रश्नाला वाचा फोडली होती. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून याबाबतीत दखल घेण्यात आली असून संबंधित शाखाप्रमुख अनिल गायकवाड यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे.
याबाबतीत संदीप सातव यांनी बँकेच्या प्रशासनाकडे याबाबतीत तक्रार केली होती. यात बँकेचे पासबुक वेळेवर अपडेट करून न देणे, नवीन खाते उघडण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ, सी टी एस प्रणालीचे चेक वटवण्याचे काम देखील आठ-आठ दिवसानंतर, जाणीवपूर्वक नागरिकांचे पैसे खात्यात येण्याऐवजी बँकेच्या शाखाप्रमुखांकडून टाळाटाळ, बँकेचे कर्मचारी हे वेळेत उपस्थित नसल्याने नागरिकांना बँकिंग व्यवहारासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागणे, ग्रामपंचायत केसनंद यांच्या वतीने महावितरणचे वीज बिल भरणा केंद्र बँकेत सुरु करण्यासाठी पत्रव्यवहार होऊन देखील टाळाटाळ, कंत्राटदार कर्मचारीपासून इतर सर्व कर्मचारी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करू लागले आहेत, असा आरोप सातव यांनी निवेदनात केला होता.
“केसनंद बँकेच्या शाखा व्यवस्थापकांची बदली करण्यात आली आहे. त्याबद्दल बँक प्रशासनाचे आभार. मात्र त्यांची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी.” – संदीप सातव, (नेते, भाजप पुणे जिल्हा)