प्रभात वृत्तसेवा पुणे – बिबट्यांचा माणसावरील हल्ला आणि बिबट्यांची वाढती संख्या यावर उपाययोजना म्हणून त्यांची नसबंदी करण्याला केंद्राने काही अटींसह परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी केवळ जुन्नर परिक्षेत्रापुरतीच मर्यादित असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे.जुन्नर आणि शिरूर तालुक्यात ८२ ठिकाणच्या जागा खूप पूर्वी ओसाड होत्या, परंतु दोन धरण आणि मुबलक पाणी आल्याने तेथील ऊसक्षेत्र, भाजीपाला आणि जंगलपरिक्षेत्र वाढल्याने तेथे बिबट्यांची संख्याही वेगाने वाढल्याचे ते म्हणाले. जंगल भागात त्यांना खाद्य मिळेनासे झाले आहे त्यामुळे त्यांनी आता मानवी वस्तीत शिरकाव सुरू केला आहे. या भागात सुमारे दीड हजार बिबटे असल्याची माहिती नाईक यांनी दिली.बिबट्यांवर नियंत्रण आणण्यासाठी एआय नियंत्रित आलार्म कॅमेरे, लोखंडी काट्यांचे कॉलर सौर आणि विद्युत कुंपण यासह अनेक उपाययोजना सध्या सुरू आहेत. मात्र त्यांची मुळात संख्या नियंत्रणात आणणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच त्यांना पकडून त्यांची नसबंदी करणे आदी उपाय केले जाणार असल्याचे नाईक म्हणाले. पिंजऱ्यांची संख्या वाढवणार बिबट्यांना पकडण्यासाठी २०० पिंजरे उपलब्ध आहेत आणखी एक हजार पिंजरे वाढवले जाणार आहेत. पकडलेल्या बिबट्यांना वनतारामध्ये पाठवले जाणार आहे. परंतु त्यांच्याकडेही किती बिबटे पाठवायचे याला मर्यादा आहेत. आफ्रीके सारख्या देशांमध्ये चित्ते आहेत परंतु बिबटे नाहीत त्यामुळे त्यांनीही बिबट्यांची मागणी केली आहे. तेथेही ते पाठवण्याबाबत विचार सुरू असल्याचे नाईक यांनी नमूद केले. नाशिकमध्येही करावा लागणार बंदोबस्त नाशिक परिसरातही नुकताच एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला होता. नियोजित कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तेथेही बिबट्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. एकूणच बंदोबस्तासाठी ११ कोटी रुपये खर्चून यंत्रणा उभारली जाणार आहे. अशीच यंत्रणा अहिल्यानगर नाशिक येथेही उभारली जाणार असून, कुंभमेळ्यात येणारे भाविक सुरक्षित राहतील याची काळजी घेतली जाणार आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तो विषय असेल आणि नाशिकला पालकमंत्री नाही परंतु कुंभमेळा आणि आदी जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे ते यात लक्ष घालतील, असेही नाईक यांनी नमूद केले. मनुष्यबळ वाढवण्यासाठी कंत्राटी पद्धत नको; बाँड सिस्टिम राबवणार वनविभागाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. बराचकाळ भरतीही झालेली नाही, याविषयी बोलताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ भरण्याला माझा विरोध राहील. यासाठी बाँड पद्धतीने मनुष्यबळाची भरती करणे मला योग्य वाटते. हा प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे ठेवणार आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्यावर कार्यवाही होईल. धंगेकरांच्या विषयावर आमचे प्रवक्ते उत्तर देतील गेल्या काही दिवसांपासून महायुतीत असूनही माजी आमदार रवींद्र धंगेकर हे भाजपच्या विरोधात बोलत आहेत. काही दिवसांपूर्वी आपणही भाजपवर टीका केली होती, त्याबद्दल विचारले असता, यावर आमचे प्रवक्ते उत्तर देतील असे म्हणत प्रश्नाला बगल दिली.