Nagar: संगमनेरात दोन गटांत पुन्हा राडा ; कठोर कारवाई करण्याची मागणी

संगमनेर- तालुक्यातील निळवंडे गावातील तिघे तरुण शहरातून आपले काम उरकून घरी जात असताना दिल्ली नाका परिसरातील पान टपरीवर पान खाण्यासाठी थांबले. पहिल्यांदा आवाज देऊन न ऐकल्यामुळे पुन्हा आवाज दिला असता, खाली मान घालून बोलायचे आणि कमी आवाजात बोलायचे, तुमचा आमदार निवडून आल्यामुळे तुम्ही आमचे काही करू शकत नाही, असे म्हणत डोक्यात तलवारीची मूठ मारून तिघांनाही पंधरा ते वीस लोकांच्या जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री सात वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे संगमनेरात काही वेळ तणाव पाहायला मिळाला
विकास दीपक गायकवाड (वय 26, रा. निळवंडे, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, मोबाईलला स्क्रीन गार्ड टाकण्यासाठी मित्र निखिल बिडवे आणि विकास आहेर असे तिघेजण संगमनेर शहरात आले होते. काम आटोपल्यानंतर अंदाजे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नाटकी नाला, दिल्लीनाका जवळ, संगमनेर-लोणी रस्त्यावरील “लकी पान स्टॉल” येथे पान घेण्यासाठी थांबले. दुकानात जाऊन एक साधे पान देण्यास सांगितले. परंतु दुकानदाराने म्हणणे ऐकले नसल्यामुळे विकास याने पुन्हा त्यास एक साधे पान द्या, असे सांगितले. दुकानदार म्हणाला की, “आवाज नीचे करके बात करने का और आॅंख नीचे करके बात कर, हमे पता है तुम्हारा आमदार आया है, पर उसका हम पर कुछ फरक नही पडेगा” असे म्हणून तो दुकानाच्या बाहेर आला. त्याच्या हातामध्ये एक तलवार होती. त्याने ती विकासच्या डोक्यात मारली. त्यावेळी तलवारीची मूठ लागल्यामुळे विकास खाली पडला. त्याचवेळी इतर पंधरा ते वीस अनोळखी लोक आले. त्यांनी विकास आणि बाकीच्या दोन मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यातील दुकानदाराने मोठ्याने आवाज दिला, “इसमें से दो लोगों को काट डालेंगे, इसका सब पे असर पडेगा” असे म्हणत त्या 15 ते 20 लोकांच्या जमावाने पुन्हा तिघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तेथून निघून गेले. यावेळी विकासच्या हातातील 40 हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याची अंगठी, आठ हजार रुपये, निखील बिडवे यांच्या हातातील 6000 रुपये किमतीची चार ग्रॅम वजनाची सोन्याची व चांदीची अंगठी, तसेच नऊ हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण 63 हजार रुपयांचा मुद्देमाल मारहाण करणाऱ्यांनी काढून घेतला. त्यामुळे अज्ञात 15 ते 20 लोकांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती समजताच आमदार अमोल खताळ यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात येऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्यास सूचना केल्या आहेत. प्रशासनाने अशा लोकांवर योग्य कारवाही करून त्यांना कोणी राजकीय खतपाणी घालत असेल तर त्यांचाही बंदोबस्त लावला जाईल, असा इशारा खताळ यांनी दिला.





