Fertilizer Price Hike – मावळ आणि खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात शेतीचे गणित बिघडू लागले आहे. विद्राव्य खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे. उत्पादन खर्च वाढला आहे. आखाती युद्धामुळे निर्यात थांबल्याने नफा मात्र कमी झाला आहे. त्यामुळे बागायती आणि पॉलिहाउस शेती संकटात सापडली आहे. मावळ आणि खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर फळ, फूल बागा आहेत. तसेच येथील शेतकरी भाजीपाला पीके घेतात. मात्र, आखाती देशातील युद्धाचा फटका खत पुरवठ्याला बसला आहे. त्यामुळे खतांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना या दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. फळबाग, भाजीपाला आणि फूलशेतीसाठी ही खते अत्यावश्यक असतात. मात्र, गेल्या काही महिन्यांत खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. काही खतांचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. दरवाढीमुळे विक्रेत्यांनाही अडचणी वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी उधारीवर खत देण्याची प्रथा आहे. मात्र, दरातील चढ-उतारामुळे हे गणित कोलमडले आहे. आयात धोरण आणि बाजारातील अस्थिरता यामुळे दर वाढल्याचे सांगितले जात आहे. खत दरवाढ शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, प्रत्येक टप्प्यावर खतांचा वापर आवश्यक असतो. ठिबक सिंचनाद्वारे ही खते थेट पिकांपर्यंत पोहोचवली जातात. त्यामुळे उत्पादन वाढते. मात्र, आता खतांच्या वाढत्या किमतीमुळे खरेदी कमी झाली आहे. याचा थेट परिणाम पिकांच्या गुणवत्तेवर होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने यामध्ये हस्तक्षेप करत खतांच्या दरांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दर नियंत्रणात आणले नाहीत, तर शेती व्यवसाय टिकवणे कठीण होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. दरम्यान सध्या उन्हाळा असल्याने शेतीमध्ये काम करण्यासाठी मजूर मिळत नाही. जरी मजूर मिळाले तरी त्यांची मजुरी शेतकऱ्याना परवडणारी नाही. शेतकरी कुटुंबालाच सकाळ, संध्याकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत शेतात राबावे लागते. त्यातूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. सध्या उन्हाळा असला तरी अनेक भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडून गेला आहे. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेले पीक वाया जात आहे. काहीवेळा शासनाकडून मदत मिळते. मात्र ती मदत उशिराने आणि अत्यंत तुटपूंजी असते. त्याच खतांच्या दरवाढीने उत्पादन खर्च वाढला आहे. मात्र, त्यातुलनेत नफा मिळत नसल्याने मावळातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. “खतांच्या दरवाढीमुळे खर्च दुप्पट झाला आहे. उत्पन्न मात्र वाढलेले नाही. पॉलिहाउस धारक तसेच इतर शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.” – नानासाहेब माने, शेतकरी