Rajesh Vitekar : कृषी विद्यापीठांपेक्षा शेतकऱ्यांचे उत्पादन अधिक; आमदार राजेश विटेकर यांनी कारभाराचे काढले वाभाडे

नागपूर : आर्थिक टंचाई, खतांचा तुटवडा, नैसर्गिक आपत्ती अशा प्रतिकूल परिस्थितीतही परभणीसह मराठवाड्यातील शेतकरी परभणी येथील कृषी विद्यापीठ पेक्षा ५ ते ६ पट जास्त उत्पादन काढतात. संशोधनावर दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करूनही जर विद्यापीठे रोल मॉडेल बनू शकत नसतील तर अशी अपयशी कृषी विद्यापीठे हवीतच कशाला? असा सवाल करत आमदार राजेश विटकर यांनी विद्यापिठाच्या कारभाराचे वाभाडे काढले.
तसेच महाराष्ट्र कृषी सेवा व संशोधन परिषद पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र राज्य यांनी विद्यापीठाच्या अशा कामगीरीची दखल घेण्याची मागणी त्यांनी हिवाळी अधिवेशनात केली. हिवाळी अधिवेशनात आमदार विटेकर यांनी परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या निष्क्रिय कामकाजाबद्दल औचित्याच्या मुद्याद्वारे शासनाचे लक्ष वेधले. विटेकर म्हणाले, कोट्यवधी रुपयांचा खर्च करुनही शेतक-यांपेक्षा अत्यल्प उत्पादन मिळविणा-या परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या कारभारामुळे जनतेत अनास्था निर्माण झालेली आहे.
लोका सांगे ब्रम्हज्ञान अन् आपण कोरडे पाषाण अशी विद्यापीठाची स्थिती आहे. उत्कृष्ट प्रतीचे बियाणे, खताची पुरेशी मात्रा, दर्जेदार फवारणी औषधी, पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्याशिवाय शेतक-यांना भरघोस उत्पन्न मिळणार नाही असे सल्ले देणा-या परभणीच्या कृषी विद्यापीठाने काढलेले किरकोळ उत्पादन लक्षात घेता विद्यापीठ म्हणजे पांढरा हत्ती पोसण्याचा प्रकार होत आहे का? असा प्रश्न मराठवाड्यातील शेतक-यांना पडला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून अत्यंत फुटकळ उत्पादन मिळाल्याचे निदर्शनास आले आहे, असे ते म्हणाले.
संशोधनावर फक्त २ कोटी खर्च
विद्यापीठाने सोयाबीनचे २ हजार ३०७ हेक्टरवर पेरणी करून ६ हजार ६२८ क्विंटल उत्पन्न मिळवले आहे. म्हणजे केवळ २.८७ प्रती एकर उत्पन्न मिळवले. परभणी जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी सोयाबीनचे सरासरी दहा क्विंटल उत्पन्न काढतात. ४७ एकर क्षेत्रावर मुगाची पेरणी करून फक्त ५४ क्विंटल उत्पन्न काढले म्हणजे प्रती एकर केवळ १ क्विंटल इतके अत्यल्प उत्पन्न मिळवले.
दरवर्षी मिळणा-या १०० कोटी रुपयांच्या अनुदानापैकी फक्त २ कोटी रुपये संशोधनासाठी खर्च केले जातात तर सुमारे ३४ कोटी रुपये मजुरांची बनावट हजेरी दाखवून उचलण्यासाठी खर्च केले जातात, असा आरोपही विटेकर यांनी केला.





