प्रभात वृत्तसेवा खेड शिवापूर – मागील आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शिवगंगा खोऱ्यातील भात उत्पादन शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. भात पिके काढणीच्या अवस्थेत आले असताना आठवडाभर पडत असलेल्या पावसाने भात पिके शेतात आडवी पडल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.दरम्यान भात शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे पिके काही ठिकाणी पाण्यामध्ये आडवी पडली आहे. तसेच भात पिकांवर तपकिरी, तुडतुडे, फुलकिडे, व करपा रोगांचा अनेक ठिकाणी प्रादुर्भाव दिसून येतं आहे, या सर्व कारणांमुळे उत्पादनात घट होणार आहे. यावर्षी आठ महिन्यापासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतीमध्ये भात पीक घेताना जास्त खर्च झाला आहे. गेल्या सहा महिन्यांत रासायनिक खतांच्या किंमती १०० ते ५०० रुपये प्रति बॅगने वाढल्या आहेत. या वर्षी बियाणे तसेच मजुरी खर्च पण वाढला आहे. अशा परस्थितीत सतत पडत असलेल्या पावसामुळे भात उत्पादनात घट होणार आहे व उत्पादन खर्चाच्या मानाने तांदुळाला भाव मिळत नाही. त्यामुळे भविष्यात भात उत्पादक शेतकरी अडचणीत येणार आहेत, असे मत नवविकास युवक शेतकरी संघटना अध्यक्ष दादासाहेब पवार यांनी व्यक्त केले.