नवी दिल्ली – दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या पाचही ठिकाणांवर इंटरनेटची सुविधा सुरू करावी अन्यथा देशभर आंदोलन करण्याचा इशारा क्रांतीकारी किसान युनियनचे अध्यक्ष दर्शन पाल यांनी दिला.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देशाच्या राजधानीत झालेल्या हिंसाचारानंतर गृहमंत्रालयाने सिंघू, गाझीपूर, टिकरी, मकबरा चौक, नांग्लोई आणि आजूबाजूच्या भागातील इंटरनेट सेवा खंडित करण्याचे आदेश दिले. “सध्या निदर्शने सुरू आहेत, त्या भागात इंटरनेट सेवा सुरळीत करावी अशी आमची मागणी आहे.
अन्यथा आम्ही देशभर निदर्शने करू, असे पाल म्हणाल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
दिल्लीजवळच्या सोनिपत, झज्जर आणि पलवाल जिल्ह्यातही मंगळवारपासून इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. कोणतेही अनुचित प्रकार टाळण्यासाठी शनिवारपर्यंत ही बंदी असल्याचे प्रशासनाच्या आदेशात नमूद केले आहे.
त्यानंतर ही इंटरनेट बंदी आणखी 14 जिल्ह्यात लागू करण्यात आली. अंबाला, यमुनानगर, कुरूक्षेत्र, कर्नाल, कैथाल, पानिपत, हिसार, जिंद, रोहतक, भिवनी, चरखी दादरी, फतेहबाद, रेवारी आणि सिरसा या जिल्ह्यांचा त्यात समावेश होता. या 14 जिल्ह्यात व्हॉईस कॉल वगळता सर्व बंद ठेवण्याचे आदेश हरियाणा प्रशासनाने दिले आहेत.