Farm loan waiver : कर्जमाफीचे पैसे ‘या’ तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
Farm loan waiver :

Farm loan waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत्या दोन ते चार दिवसांत सुमारे ५ ते १० हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम येथे दिली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जात आहे.
कर्जमाफीच्या याद्यांची सध्या ‘ॲग्रीस्टॅक’ प्रणालीद्वारे पडताळणी सुरू आहे. याद्या अद्ययावत होताच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम थेट जमा केली जाणार आहे. शासनाकडे यासाठी पुरेसा निधी उपलब्ध असल्याचेही भरणे यांनी स्पष्ट केले. या योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना एकूण ४० हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे.
शहरी भागातील शेतकऱ्यांनाही कृषी योजनांचा लाभ
शहरी भागातील शेतकऱ्यांना सिंचन विहीर आणि इतर कृषी योजनांचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. याबाबत आपल्याला पूर्वकल्पना नसल्याचे भरणे यांनी सांगितले. मात्र, भविष्यात शहरी भागातील शेतकऱ्यांनाही शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळण्यासाठी योग्य ती तरतूद केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
सातबारा नोंद नसलेल्या २ लाख ३१ हजार शेतकऱ्यांना दिलासा
सातबारा उतारा किंवा इतर अधिकार अभिलेखांवर नावे नोंद नसलेल्या राज्यातील २ लाख ३१ हजार शेतकऱ्यांना अधिकृत रेकॉर्डवर आणण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. यामुळे या शेतकऱ्यांचा ‘ॲग्रीस्टॅक’मध्ये समावेश होण्याचा मार्ग मोकळा होणार असून, त्यांना कर्जमाफीसह विविध कृषी योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना १५ दिवसांच्या आत यासंदर्भातील सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.





