Dharmarao Baba Atram : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. महायुतीकडून या निवडणुकींच्या अनुषंगाने रणनिती ठरवली जात आहे. पण सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की तिन्ही पक्ष (भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी) एकत्र असल्याने स्थानिक पातळीवरील परिस्थिनुरूप निर्णय या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना घ्यावा लागणार आहे. शक्य तिथे एकत्र आणि जिथे काही अडचण असेल तिथेल परिस्थिती पाहून तसा निर्णय घेणार असल्याचे तिन्ही नेत्यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. या सगळ्या वातावरणात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री धर्माराव बाबा अत्राम यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपवर अत्यंत खळबळजनक आरोप केल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या दाव्याने पडसाद उमटल्याची शक्यता आहे. गडचिरोली येथील चामोर्शी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात विधानसभा निवडणुकीत भाजपने माझ्या विरोधात पुतण्याला ५ कोटी रुपये देऊन उभे केल्याचा खळबळजनक आरोप अत्राम यांनी केला आहे. अहेरी विधानसभेतील पाच तालुक्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. या सर्व निवडणुका आमचा पक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस) स्वबळावर लढवणार आहे, अशी मोठी घोषणा केली आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढू असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीसाठी प्रस्ताव दिला तर जिल्हा परिषदेत ५१ पैकी ३२ जागा मागणार असल्याचे दावा धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे. प्रस्ताव न आल्यास स्वबळावर लढू असे ते म्हणाले. यामुळे गडचिरोलीतील राजकीय वातावरण तापले असून, आत्राम यांच्या आरोपांवर भाजपकडून काय प्रत्युत्तर येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : साताऱ्यात रंगणार ‘हिंदकेसरी’चा महासंग्राम! २६ राज्याचे संघ सहभागी होणार ; कुस्ती स्पर्धेसाठी बक्षिसांचा धमाका