पुणे – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) एकभाषिक पूरक पुस्तक वाचन योजनेतील संत, महापुरुष यांच्यावरील पुस्तकांचे इतिहास तज्ज्ञांच्या समितीमार्फत परीक्षण करण्यात येत असून आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या महिन्याभरात पुस्तक परीक्षणांचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांना संत, महापुरुषांसह इतर विविध गोष्टींची माहिती व्हावी, यासाठी पुस्तके उपलब्ध करुन देण्यात येतात. गेल्या वर्षी दोन पुस्तकांमधील लिखाण आक्षेपार्ह आढळून आले होते. यावर काही संघटनाकडून आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यावर तीन इतिहास तज्ज्ञांचा समावेश असलेली एक विशेष समिती नियुक्त करुन या पुस्तकांचे परीक्षण करण्यात आले होते. समितीच्या अहवालानुसार दोनही पुस्तके योजनेतून रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेली ही आक्षेपार्ह पुस्तके जमा करुन घेण्यात आली होती.
त्यानंतर योजनेतील सुमारे 1 हजार 500 पुस्तकांचे तज्ञांच्या समितीमार्फत परीक्षण करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार गेल्या डिसेंबरपासून समितीतील तज्ज्ञ जसे जमेल तसे कार्यालयात येऊनच पुस्तकांचे परीक्षण करत आहेत. त्या त्या दिवशीचा अहवाल लगेच तयार करुन ते दाखलही करतात. समितीला वेगाने काम पूर्ण करण्याच्या सूचना अनेकदा अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या आहेत. आत्ता पर्यंत बऱ्यापैकी काम पूर्ण झाले आहे. आता केवळ सुमारे 50 पुस्तकांचे परीक्षण शिल्लक राहिले आहे. हे कामही येत्या आठवडाभरात संपणार आहे. यानंतर परीक्षणाबाबतचा एकत्रित अहवाल तयार करण्यात येणार आहे. याची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे.
त्यानंतर अंतिम अहवाल तयार करुन तो शिक्षण विभागाला सादर करण्यात येणार आहे. समितीकडून सादर होणाऱ्या अहवालानुसार शासनाकडून त्यावर कार्यवाही करण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. या निर्णयासाठी विद्या प्राधिकरणाला अंमलबजावणी करावी लागणार आहे हे स्पष्टच आहे.