नापाक असत्य ‘उघड’; ‘बालाकोट’ हल्ल्यात 300 दहशतवादी मारले गेल्याची ‘कबुली’

लाहोर – भारताने 26 फेब्रूवारी 2019 ला केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये 300 दहशतवादी मारले गेल्याची कबुली पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी झाफर हिलाली यांनी दिली.
पकिस्तानने यापुर्वी या हल्ल्यात कोणीही मरण पावले नसल्याचे म्हटले होते.
त्यामुळे पाकिस्तानचे असत्य उघड झाले आहे. पाकिस्तानातील एका उर्दु वाहिनीवरील चर्चेत सहभागी होताना हिलाली म्हणाले, भारताने सीमा ओलांडून केलेली कृती हे युध्दच होते. त्यात तीनशे पेक्षा अधिक जण मरण पावले. मात्र आमचे लक्ष्य त्यांच्यापेक्षा वेगळे होते.
पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पथकावर जैश ए महंमदने केलेल्या हल्ल्यात 40 जण मरण पावले. त्याचा बदला म्हणून जैशच्या बालाकोट येथील तळावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
तो हवाई दलाच्या विमानांनी निष्फळ ठरवला होता. यात भारताचे एक मिग 21 विमान कोसळले तर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याला पाकिस्तानने पकडले होते. मात्र नंतर त्याची सुटका करण्यात आली.
आम्ही त्यांच्या हाय कमांडवर हल्ला केला. कारण ती त्यांच्या लष्कराची माणसे होती. आम्ही मर्यादित स्वरूपाचा सर्जिकल स्ट्राईक केला. त्यात जिवीत हानी झाली नाही. मात्र त्यांनी जे केले ते आम्ही करू शकतो, एवढेच आम्हाला दाखवून द्यायचे होते. त्यात आम्ही यशस्वी ठरलो, असे हिलाली म्हणाले.





