आळेफाटा : पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे दुबईत अडकलेल्या आळेफाटा येथील जाधव कुटुंबाने अखेर सुखरूप मायदेशी परतत सुटकेचा निःश्वास टाकला आहे. व्यावसायिक राजेंद्र रमेश जाधव, त्यांची पत्नी संगीता जाधव आणि मुलगी स्नेहल जाधव हे तिघे शुक्रवारी (दि. ६) मध्यरात्रीनंतर पुणे येथे सुखरूप पोहोचले. या कठीण काळात स्थानिक युवा नेते अमित बेनके यांनी प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून आणि कुटुंबाला धीर देऊन आवश्यक पाठपुरावा केला, ज्यामुळे त्यांचे सुरक्षित परतणे शक्य झाले. मिळालेल्या माहितीनुसार, आळेफाटा येथील व्यावसायिक राजेंद्र जाधव हे कुटुंबासह २६ फेब्रुवारी रोजी पर्यटनासाठी दुबईला गेले होते. मात्र, २८ फेब्रुवारी रोजी इराण, अमेरिका व इस्रायल यांच्यात तणाव वाढून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्याच दिवशी जाधव कुटुंब दुबईतील बुर्ज खलिफा परिसरात असताना त्यांना आकाशात मिसाईलसदृश वस्तू दिसल्याने मोठी घबराट पसरली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. वाढत्या तणावामुळे विमानसेवा काही काळ ठप्प झाल्याने हे कुटुंब तिथेच अडकून पडले होते. या संकटकाळात युवा नेते अमित बेनके यांनी संबंधित भारतीय दूतावास आणि प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली व कुटुंबाला भारतात परतण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. अखेर ५ मार्च रोजी विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर जाधव कुटुंबाने भारताकडे प्रस्थान केले. ६ मार्च रोजी मध्यरात्री ते पुणे विमानतळावर दाखल झाले. परदेशातील तणावपूर्ण वातावरणातून सुखरूप मायदेशी परतल्याबद्दल जाधव कुटुंबाने आणि आळेफाटा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. हेही वाचा : Pune District : शिरूर पूर्व भागात मोबाइल नेटवर्कचा लपंडाव