Elephanta Boat Accident : मुंबई बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू, ‘असा’ घडला अपघात

Elephanta Boat Accident : मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ एलिफंटा बेटावर जाणाऱ्या नीलकमल नावाच्या प्रवासी जहाजाला नौदलाच्या जहाजाची धडक बसून मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत तीन नौदल कर्मचाऱ्यांसह एकूण १३ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. इतर 101 प्रवासी वाचले असल्याचे सांगण्यात येत आहे. तर अनेकांचा शोध सुरू आहे. तर दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
#WATCH | Mumbai Boat accident | Mumbai: The Indian Coast Guard releases the video of the rescue operation of the capsized boat near the Gateway of India.
There were a total of 85 passengers on board including the crew. 80 people have been rescued so far and 5 people are… pic.twitter.com/oTLr4SuaJG
— ANI (@ANI) December 18, 2024
मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रकरणाची दखल-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुंबईजवळील बुचर आयलंड येथे दुपारी 3.55 च्या सुमारास नौदलाच्या बोटीची ‘नीलकमल’ या प्रवासी जहाजाला टक्कर झाली. सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 101 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 13 मृतांमध्ये 10 नागरिक आणि 3 नौदलाचे कर्मचारी आहेत. ते म्हणाले की, दोन जण गंभीर जखमी असून, त्यांना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नौदल, तटरक्षक दल आणि पोलिसांनी 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉप्टर वापरून बचावकार्य केले आहे. बेपत्ता लोकांची अंतिम माहिती उद्या सकाळी मिळेल.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर –
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. नौदलाबरोबरच पोलीसही या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
बोटीत सुमारे 110 लोक होते –
मिळालेल्या माहितीनुसार, बोटीमध्ये सुमारे 110 लोक होते, मात्र नेमक्या संख्येची पुष्टी होऊ शकली नाही. ही बोट मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या एलिफंटा बेटाकडे जात असताना दुपारी चारच्या सुमारास एका छोट्या बोटीला धडक बसली आणि बोट उलटली. या घटनेनंतर लगेचच जारी करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये बचावकार्य सुरू असल्याचे दिसून आले आहे.
संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली माहिती –
बचाव मोहिमेची माहिती देताना एका संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, नौदल आणि तटरक्षक दलाने मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू केले आहे. नौदलाच्या अकरा बोटी, सागरी पोलिसांच्या तीन बोटी आणि तटरक्षक दलाची एक बोट या परिसरात तैनात करण्यात आली आहे.
बचाव कार्यात चार हेलिकॉप्टर सहभागी –
संरक्षण अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, चार हेलिकॉप्टर डझनभराहून अधिक प्रवाशांच्या शोध आणि बचाव कार्यात गुंतले आहेत, तर स्थानिक पोलीस, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि परिसरातील मच्छिमार देखील बचाव कार्यात सहभागी आहेत.
अपघात कसा घडला?
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियातून प्रवाशी नीलकमल ही बोट एलिफंटाकडे जात होती. यावेळी त्याच ठिकाणी समूद्रात नेव्हीच्या बोटीच्या नवीन इंजिनचे टेस्टिंग सुरू होते. त्यामुळे ही बोट समुद्रात आठ या आकारात फिरत होती. त्याचवेळी एक राऊंड मारून आलेल्या या बोटीने समोरून नीलकमल या बोटीला धडक मारली. नवीन इंजिनमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यानंतर या बोटीवरचे नियंत्रण सुटले आणि तिने नीलकमल या बोटीला समोरून धडक दिल्याची माहिती नेव्हीने दिली आहे.




