Electric Bus: निगडी डेपोतील इलेक्ट्रिक बस वारंवार बंद; अचानक फेऱ्या रद्द झाल्याने हजारो प्रवाशांची फरफट
Electric Bus: तांत्रिक बिघाडांचे वाढते प्रमाण; पीएमपीएमएलच्या सेवांवर प्रवाशांचा संताप

पिंपरी – पर्यावरणपूरक आणि आधुनिक वाहतूक म्हणून सुरू करण्यात आलेल्या पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिक बसांच्या सेवेला आता वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडाचे ग्रहण लागले आहे.
विशेषतः निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस स्थानकातून धावणाऱ्या इ-बस अचानक बंद पडत असल्याने अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. मात्र, बस रद्द झाल्याची कोणतीही पूर्वसूचना दिली जात नसल्याने दररोज हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
निगडी डेपो हा पिंपरी-चिंचवडमधील सर्वात महत्त्वाचा बस टर्मिनल मानला जातो. येथून पुणे शहरासह हिंजवडी, वाघोली, कात्रज, भोसरी, आकुर्डी, मामुर्डी, पुणे स्टेशन आणि महापालिका भवन या प्रमुख मार्गांवर दररोज सुमारे १०० इलेक्ट्रिक बस धावतात. मेट्रो फीडर सेवाही मोठ्या प्रमाणात याच बसांवर अवलंबून आहे.
मात्र, तांत्रिक बिघाडामुळे अनेक बस मार्गातच बंद पडतात किंवा डेपोतूनच बाहेर पडू शकत नाहीत. परिणामी फेऱ्या रद्द होतात. याची माहिती प्रवाशांना दिली जात नसल्याने बसस्थानकावर गोंधळाचे वातावरण निर्माण होते. पुढील बस किती वेळाने येणार, याची माहिती देण्यासाठीही कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे. त्यामुळे नोकरदार, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
निगडी डेपोतून दररोज सुमारे ५७ हजार प्रवासी प्रवास करतात. महिन्याला सुमारे १७ लाख ७६ हजार प्रवासी या सेवेचा लाभ घेतात. या इ-बस महिन्याला सुमारे ७ लाख ९० हजार किलोमीटर धावतात. त्यातून पीएमपीएमएलला सुमारे अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. एका इ-बसमधून दररोज सरासरी ५५० प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे एक फेरी रद्द झाली तरी त्याचा थेट परिणाम प्रवाशांसह पीएमपीएमएलच्या उत्पन्नावरही होत आहे.
विशेषतः हिंजवडी आयटी पार्क, वाघोली, हडपसर आदी भागांत जाणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना या समस्येचा मोठा फटका बसत आहे. वेळेवर बस न मिळाल्याने कार्यालयात उशीर होणे, विद्यार्थ्यांच्या तासिका चुकणे आणि पर्यायी वाहनांवर अतिरिक्त खर्च करावा लागणे, अशा तक्रारी वाढत आहेत. इ-बस सेवा अधिक विश्वासार्ह करण्यासाठी तांत्रिक देखभाल मजबूत करण्यासोबतच बस रद्द झाल्यास प्रवाशांना तातडीने माहिती देण्याची प्रभावी व्यवस्था उभारण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
“तांत्रिक कारणामुळे बस रद्द करावी लागत असेल, तर किमान डिजिटल फलक किंवा ध्वनिक्षेपकाद्वारे प्रवाशांना माहिती द्यावी. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करता येईल. मात्र, माहितीच मिळत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते.” – चैताली कालदंते, प्रवासी
“बसमध्ये तांत्रिक बिघाड आढळल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन संबंधित फेरी रद्द केली जाते. बिघाड तातडीने दूर करून बस पुन्हा मार्गावर सोडण्यात येते.” – यशवंत हिंगे, व्यवस्थापक, निगडी डेपो
Ajit Pawar Birthday : काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणारा नेता





