प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३२ प्रभागांमधील अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबसी) आणि महिलांसाठीच्या राखीव जागांची सोडत ११ नोव्हेंबरला झाली होती. त्यानंतर याबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता. आयोगाने शहरातील दोन प्रभागांमध्ये बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रभाग क्रमांक ३० मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी थेट पद्धतीने महिलेसाठी जागा देणे आवश्यक होते. मात्र, प्रशासनाकडून त्याठिकाणी सोडत काढण्यात आली. त्यामुळे ती रद्द करून दोन प्रभागांमध्ये बदल करण्यात आला असून चार जागांवर त्याचा परिणाम झाला आहे.आरक्षण सोडत घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने नियमावली दिली होती. त्यातील नियमानुसार, प्रथम ज्या प्रवर्गामध्ये नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गाकरता दोन जागा राखीव असतील त्या प्रभागामधील एक जागा थेट नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गातील महिलासाठी राखीव ठेवण्यात येईल. तसेच त्यानंतर ज्या प्रभागांमध्ये एक किंवा अधिक जागा एकतर अनुसूचित जाती किंना अनुसूचित जमाती किंवा दोन्हीसाठी राखीव असतील परंतु त्या जागा त्या प्रवर्गातील महिलाकरिता राखीव नसतील तर अशा प्रभागातील नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गाची जागा महिलाकरिता राखून ठेवण्यात येईल असा नियम आहे. मात्र, याठिकाणी प्रभाग क्रमांक ३० ची जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग झाली होती. कारण सोडतीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागेसाठी या प्रभागाची चिठ्ठी आली नव्हती. राज्य निवडणूक आयोगाने यामध्ये नियमानुसार झाले नसल्याचे निदर्शनास आणून देत बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.त्यानुसार, प्रभाग क्रमांक ३० मधील क जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग एवजी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव करण्यात आली आहे. त्यामुळे ड जागा ही सर्वसाधारण महिला एवजी सर्वसाधारण झाली आहे. याचा परिणाम प्रभाग क्रमांक १९ वर झाला आहे. कारण आयोगाच्या सुचनेनुसार सर्वात शेवटी ज्या प्रभागाची चिठ्ठी काढली ती रद्द करण्यात यावी. त्यामुळे प्रभाग क्रमांक १९ मधील ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एवजी नागरिकांचा मागास प्रवर्ग झाली आहे. म्हणजेच येथील महिलेचे आरक्षण रद्द झाले आहे. तर क जागा सर्वसाधारण एवजी सर्वसाधारण महिला असे झाले आहे. आयोगाने अचानक हा बदल केल्याने प्रभाग क्रमांक ३० मधील काही राजकीय कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी निवडणूक विभागात सोमवारी (दि. १७) गोंधळ घातला. त्यांना उपायुक्त सचिन पवार यांनी नियम तसेच निवडणूक आयोगाचे आदेश वाचून दाखवले. तसेच याबाबत हरकती व सूचना घेण्यास मुभा असल्याचे देखील सांगितले. “आरक्षण सोडतीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता. आयोगाने त्यामध्ये दोन प्रभागामध्ये बदल करण्यास सांगितले आहे. त्यानुसार बदल करण्यात आले आहेत. यावर हरकती घेण्यास संधी आहे. तसेच याबाबतचे आदेश सर्वांसाठी उपलब्ध आहेत.” – सचिन पवार, उपायुक्त, निवडणूक विभाग.