संपूर्ण देशभरात एसआयआर प्रक्रिया राबवण्यासाठी निवडणूक आयोगाची बैठक ; सर्वात आधी या 5 राज्यांचा नंबर

नवी दिल्ली: संपूर्ण देशात मतदार याद्यांच्या ‘स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन’ (SIR) अर्थात विशेष गहन पुनरीक्षण मोहिमेला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाने बुधवारी राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत दोन दिवसीय उच्चस्तरीय बैठक सुरू केली.
या प्रक्रियेचा मुख्य उद्देश मतदार यादीतील अवैध विदेशी घुसखोरांची ओळख पटवणे असल्याचे मानले जात आहे. पहिल्या टप्प्यात, ही मोहीम त्या राज्यांमध्ये सुरू होईल जिथे २०२६ मध्ये विधानसभा निवडणुका आहेत, जसे की पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुडुचेरी आणि तामिळनाडू.
आयोगाच्या अधिकाऱ्यांनुसार, बिहारमध्ये नुकतीच एसआयआर प्रक्रिया राबवण्यात आली, ज्यानंतर ३० सप्टेंबर रोजी सुमारे ७.४२ कोटी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. आयोगाचा प्रयत्न आहे की एसआयआर टप्प्याटप्प्याने लागू व्हावा, ज्यामुळे स्थानिक निवडणुकीच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडणार नाही.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी यापूर्वीच एसआयआर सुरू करण्याबाबत संकेत दिले होते. अनेक राज्यांनी गेल्या एसआयआर नंतरच्या मतदार याद्या वेबसाइटवर अपलोड केल्या आहेत. या मोहिमेमुळे जुन्या याद्यांमधील मृत, स्थलांतरित किंवा दोन ठिकाणी नावे असलेल्या मतदारांना वगळण्यास मदत होईल, ज्यामुळे याद्या शुद्ध आणि अचूक बनतील.





