“एकतर आमचे पाणी सिंधू नदीतून वाहेल किंवा त्यांचे रक्त”; पाकिस्तानचे माजी मंत्री बिलावल भुट्टोंची उघडपणे भारताला धमकी

Pahalgam Terror Attack | पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. भारत सरकारनेही पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेत सिंधू पाणी करार बंद करण्यासारखे अनेक मोठे निर्णय घेतले. यावरून पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी चितावणीखोर वक्तव्य केले आहे.
माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो एका कार्यक्रमात बोलताना भारताबद्दल गरळ ओकली आहे. “सिंधू आमची आहे आणि ती आमचीच राहील. एकतर आमचे पाणी या नदीतून वाहेल किंवा त्यांचे रक्त त्यातून वाहेल,” असे म्हणत त्यांनी भारताला धमकी दिली आहे. सिंधू नदीच्या काठावर असलेल्या सखलमध्ये त्यांनी एका रॅलीत हे विधान केले.
“मोदींनी पाकिस्तानवर खोटे आरोप केले”
पाकिस्तानी नेते भुट्टो यांनी दावा केला की, “भारताने सिंधूवर हल्ला केला. भारताची लोकसंख्या आपल्यापेक्षा जास्त असू शकते, पण पाकिस्तानचे लोक धाडसी आहेत. आम्ही सीमेवर आणि पाकिस्तानच्या आतही लढू. आमचा आवाज भारताला योग्य उत्तर देईल. भारताने आपल्या उणीवा लपवण्यासाठी, त्यांच्या जनतेची दिशाभूल करण्यासाठी मोदींनी पाकिस्तानवर खोटे आरोप केले आहेत. या हल्ल्यामागे पाकिस्तान आहे, असे सांगितले.
सिंधु जल करार काय आहे?
भारताने १९६० चा सिंधु जल करार तात्काळ स्थगित केला आहे. सिंधु पाणी वाटप करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नद्यांच्या पाण्याच्या वाटपासंदर्भातील एक आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय करार आहे. जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार १९ सप्टेंबर १९६० रोजी पाकिस्तानातील कराची येथे झाला. भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती अयूब खान यांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या.
सिंधु नदी आणि तिच्या उपनद्यांच्या (सतलज, ब्यास, रावी, झेलम, चिनाब) पाण्याचे दोन्ही देशांमध्ये निष्पक्ष वाटप करणे हा या कराराचा मुख्य उद्देश होता. स्वातंत्र्यानंतर १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पाण्याच्या वाटपावरून वाद निर्माण झाले, कारण सिंधु नदी खोऱ्याचा मोठा भाग दोन्ही देशांत विभागला गेला. पाकिस्तानला भारतावर अवलंबून राहावे लागत होते, कारण अनेक नद्या भारतातून पाकिस्तानात वाहतात.
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीसांना ‘मी पुन्हा येईन’ पुस्तक लिहायला सांगणार; अजित पवारांची मिश्किल टिप्पणी





