मुंबई – सर्व जग पूर्वपदावर येत असतानाच चीनमध्ये करोनाचा उद्रेक झाला असल्याचे वृत्त पसरले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत चीनचे योगदान पाहता या घडामोडीचा जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाला आणि शेअर बाजार निर्देशांक एक टक्क्याने कोसळले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 635 अंकांनी कोसळून 61,067 अंकावर बंद झाला. विस्तारीत पाय असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 186 अंकांनी म्हणजे एक टक्क्याने कोसळून 18,199 बंद झाला. इंडसइंड बॅंक, बजाज फिन्सर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, ऍक्सिस बॅंक, स्टेट बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक या कंपन्यांनी सपाटून मार खाल्ला.
रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही. मात्र सन फार्मा, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, टेक महिंद्रा, नेस्ले, विप्रो, इन्फोसिस या कंपन्याच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. अन्यथा शेअर बाजार निर्देशांक आणखी कोसळले असते.
चीनमध्ये करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या बातम्या गेल्या आठवड्यापासून येत आहेत. मात्र याकडे आतापर्यंत गुंतवणूकदारानी दुर्लक्ष केले होते. मात्र कालपासून तेथून अनेक नकारात्मक बातम्या येत असल्यामुळे जागतिक शेअर बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
चीनचे जागतिक अर्थव्यवस्थेतील स्थान पाहता चीनमधील घडामोडीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. चीन ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. या घडामोडीमुळे चीनसह, जपान, दक्षिण कोरिया, युरोप आणि अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. त्याचा परिणाम भारतावरही सकाळपासूनच झाला होता.
दरम्यान अमेरिकेत प्रदीर्घ काळ व्याजदर वाढ होणार असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेत आहेत. काल या गुंतवणूकदारानी 455 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. करोनाचा उद्रेक झाला तर चीनच्या आयातीवर अवलंबून असलेल्या इतर देशाच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम होणार आहे. विशेषतः सेमीकंडक्टर आणि वाहनाच्या सुट्या भागाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो असे एलकेपी सिक्युरिटी ज्या संस्थेचे विश्लेषकेस रंगनाथन यांनी सांगितले.