नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर आणि युद्धबंदीच्या निर्णयावर सडकून टीका केली. पाकव्याप्त काश्मीर जिंकण्याची संधी असताना आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची शक्यता असताना मोदींनी बिनशर्त युद्धबंदी का जाहीर केली, असा थेट सवाल सावंत यांनी उपस्थित केला. लोकसभेत बोलताना सावंत यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणामुळे भारत एकाकी पडल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “मोदींच्या धोरणांमुळे एकही शेजारी देश भारतासोबत उभा नाही. इराणसारखा देश, जो आपल्याला उधारीवर तेल देतो, त्याच्याशीही संबंध बिघडले. सार्क देश, कॅनडा आणि इतर कोणीही भारताला पाठिंबा देत नाही. दुसरीकडे, पाकिस्तानला चीन, अमेरिका, तुर्कस्तान आणि इतर देशांचा पाठिंबा मिळाला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने युद्धकाळातच पाकिस्तानला अब्जावधींची मदत दिली, ज्याला भारताने विरोध केला होता. यावरून भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थिती स्पष्ट होते.” सावंत यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींच्या बिहारमधील इंग्रजी भाषणावरही टीका केली. “पंतप्रधानांनी टेलिप्रॉम्टर वापरून जगाला दाखवण्यासाठी इंग्रजीत भाषण केलं. पण पहलगाम आणि मणिपूरला ते गेले नाहीत. त्यांच्या संवेदना कुठे आहेत? दहशतवादी मोकाट सुटले असताना येथे ढोल बडवले जात आहेत,” असे ते म्हणाले. तसेच, “पाकिस्तानने युद्ध थांबवण्याची विनंती केली, हे मोदींनी जगाला का सांगितलं नाही? पाकिस्तान भारतासमोर झुकला, हे स्पष्ट करायला हवं होतं,” असेही ते म्हणाले. पाकिस्तानविरुद्ध संपूर्ण राष्ट्र एकवटले असताना आणि पाकव्याप्त काश्मीर जिंकण्याची संधी असताना माघार घेण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचे सावंत यांनी नमूद केले. “इंदिरा गांधींनी ज्याप्रकारे पाकिस्तानला धडा शिकवला, तशी संधी मोदींना होती. जर त्यांनी तसं केलं असतं, तर आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो,” असे त्यांनी ठणकावले. तसेच, “भाजप ‘घुसके मारेंगे’ म्हणत असतं, पण ओसामा बिन लादेनला मारण्यासारखं खरं ‘घुसके मारणे’ दाखवावं. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं बंद करा,” अशी मागणीही त्यांनी केली. सावंत यांनी भारतीय लष्कराचा गौरव केला, परंतु मोदींच्या धोरणांवर टीकास्त्र सोडताना परराष्ट्र धोरणातील अपयश आणि आंतरराष्ट्रीय पाठिंब्याचा अभाव यावर बोट ठेवले.