भावनगर :– कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची पदयात्रा ही भारत जोडो यात्रा नव्हे तर मोदी विरोधी जोडो यात्रा आहे. कारण कॉंग्रेसला आता लक्षात आले की भारताची जनता नरेंद्र मोदी यांच्याशी जोडली गेली आहे. त्यामुळे अस्तित्व टिकवायचे असेल तर देशभरात मोदींच्या विरोधकांना जोडायला हवे, तसे केले नाही तर देशात कॉंग्रेस विसर्जित होईल. त्यासाठी राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
गुजरातमधील भावनगर येथे निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले असताना फडणवीसांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कॉंग्रेस खासदार राहुल गांधी जे काही करत आहेत ते कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी केले तर ठीक. पण कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन काय करत असतील तर त्याच्यावर आम्हाला कारवाई करावी लागेल.
आम्ही भारत जोडो यात्रेला सुरक्षा दिली आहे. त्यांची यात्रा राज्याबाहेर सुरक्षितपणे पाठवू. पण त्यांनी महाराष्ट्रातील वातावरण बिघडवू नये, असा इशारा त्यांनी दिला.
अतिवृष्टीमुळे बाधित ‘या’ दोन विभागातील शेतकऱ्यांना 1286 कोटींचा निधी मंजूर; राज्य शासनाचा निर्णय
भाजपाबद्दल जनतेच्या मनात सकारात्मक भावना आहे. राहुल गांधींसारख्या लोकांवर कारवाई करण्याचा फायदा नसतो. अनेक केसेस त्यांच्यावर याआधीही झाल्या आहेत. ते जामीनावरच बाहेर आहेत. अनेकदा कोर्टात हजर राहत नाही म्हणून वॉरंटही निघतात. ते जे खोटं बोलतात त्यावर आम्ही उत्तर देऊ. तसेच सुरुवातीच्या काळात भारत जोडो यात्रेकडे माध्यमांचे लक्ष नव्हते, त्यामुळेच माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी राहुल गांधी अशी वादग्रस्त विधाने करत असल्याचे ते म्हणाले.