“शरद पवारांची साथ सोडू नका’

निगडी येथे आवाहन; पक्षांतर करणाऱ्यांवर टीका
पिंपरी – “शरद पवार महाराष्ट्रातले चांगले तसेच जाणकार नेते आहेत. शेतकऱ्यांसाठी, मराठा समाजासाठी, दलितासांठी त्यांच्या कालखंडात त्यांनी चांगले काम केले आहे. मात्र, ज्यांना ज्यांना सत्ता हवी आहे, ज्यांना निवडून येण्याची खात्री नाही, असेच लोक पक्षांतर करत आहेत. मात्र, कार्यकर्त्यांनी पवार साहेबांची साथ सोडू नये,’ असे परखड मत आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी निगडी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
एका कार्यक्रमास रामदास आठवले यांनी हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेते, आमदार, पदाधिकारी घाऊक पद्धतीने सत्तेतील भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. यावर आठवले म्हणाले, “भाजप- शिवसेनेत गेलो तर, आपली आमदारकी शाबित राहू शकते. त्यानंतर आपल्याला सत्ताही मिळू शकते, अशी भावना असणे चुकीचे अजिबात नाही. पवार साहेब आणि राष्ट्रवादीने आपले लोक सांभाळले पाहिजेत.
भाजप त्यांना घेत आहे. अशा पद्घतीचे आरोप करण्यापेक्षा त्यांनी आपले लोक सांभाळले पाहिजेत. पवारसाहेबांना मी देखील सोडले आहे. तर, बाकीचे लोक त्यांच्याकडे राहतील कसे, अशी कोपरखळी त्यांनी मारत “सत्ता मिळो ना मिळो, परंतु, सत्तेचा वापर दीनदुबळ्यांसाठी व्हायला हवा,’ असेही त्यांनी सांगितले.




