INDIA bloc : राहुल गांधींसह इंडिया आघाडीला मोठा धक्का! DMK पक्षाने घेतला मोठा निर्णय
INDIA bloc : विरोधी पक्षांच्या इंडिया (INDIA) आघाडीला मोठा धक्का देणारी घडामोड घडली असून द्रविड मुनेत्र कळघम (DMK) पक्षाने ८ जून रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार नसल्याची घोषणा केली आहे.

INDIA bloc : विरोधी पक्षांच्या इंडिया (INDIA) आघाडीला मोठा धक्का देणारी घडामोड घडली असून द्रविड मुनेत्र कळघम (DMK) पक्षाने ८ जून रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार नसल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्यानेच हा निर्णय घेतल्याचे डीएमकेने स्पष्ट केले आहे.
तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकांनंतर नाराजी –
तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेसबाबत डीएमकेमध्ये निर्माण झालेली नाराजी अद्याप कायम असल्याचे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे. निवडणुकीत डीएमकेच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने लढत दिली होती. मात्र, निकालानंतर काँग्रेसने तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिल्याने डीएमके कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता.
डीएमकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “तमिळनाडू विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेसने डीएमकेचा विश्वासघात केल्याची भावना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही तीव्र आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत डीएमके ८ जून रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार नाही.”
हेही वाचा – महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत ‘इतके’ उमेदवार बिनविरोध
तथापि, पक्षाने इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिलेले नाहीत. देशहिताशी संबंधित मुद्द्यांवर इतर विरोधी पक्षांनी घेतलेल्या भूमिकांना यापुढेही डीएमके पाठिंबा देत राहील, असेही पक्षाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, यापूर्वीच डीएमकेने लोकसभेत काँग्रेसपासून स्वतंत्र आसनव्यवस्थेची मागणी केली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांतील दुरावा वाढत असल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत डीएमके-आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर टीव्हीकेने १०८ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले.
भाजपविरोधी राजकारणात इंडिया आघाडीतील प्रमुख आणि आक्रमक आवाज मानल्या जाणाऱ्या डीएमकेच्या या निर्णयामुळे विरोधकांच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





