D K Shivakumar : कोणत्याही संघटनेत शिस्त नसेल, तर कामकाज सुरळीत चालू शकत नाही. पक्षाचा उमेदवार ठरवताना सर्वांशी सल्लामसलत केली जाते, मात्र एकदा निर्णय झाल्यावर त्याचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, अशा कडक शब्दांत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी पक्षशिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. दावणगेरे दक्षिण विधानसभा पोटनिवडणुकीतील वादाच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. (D K Shivakumar) या पोटनिवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध काम केल्याचा ठपका ठेवत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे राजकीय सचिव नझीर अहमद यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे. ९ एप्रिल रोजी पार पडलेली ही निवडणूक ज्येष्ठ आमदार शमनूर शिवशंकरप्पा यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाली होती. काँग्रेसने त्यांचे नातू समर्थ शमनूर यांना उमेदवारी दिली होती, मात्र यावरून पक्षात दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. या घडामोडींदरम्यान विधानपरिषद सदस्य अब्दुल जब्बार यांच्यासह काही नेत्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. त्यावर बोलताना शिवकुमार म्हणाले, “आम्ही कारवाईचा निर्णय घेण्यापूर्वीच काही नेत्यांनी स्वतःहून राजीनामे दिले असून ते स्वीकारण्यात आले आहेत. अहवाल आणि नेत्यांशी चर्चा करूनच मुख्यमंत्र्यांनी उमेदवार निश्चित केला होता. (D K Shivakumar) पक्षात मंत्रिपदासाठी सुरू असलेल्या हालचालींबाबत विचारले असता शिवकुमार म्हणाले की, “बैठका घेणे किंवा पदांची मागणी करणे यात काही गैर नाही, पण प्रत्येकाने कडक शिस्त पाळणे अनिवार्य आहे. सर्वांनी आपल्या सार्वजनिक वर्तणुकीबाबत सावधगिरी बाळगावी, असा सल्ला मी दिला आहे.” (D K Shivakumar) उमेदवार निवडीच्या मुद्द्यावरून पक्षात काहीसा तणाव निर्माण झाला होता; अल्पसंख्याक नेत्यांच्या एका गटाने यावर नाराजी व्यक्त करत, आपल्यालाही योग्य प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी केली होती. पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप केल्यानंतर एका बंडखोर उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेतली असली, तरीही पक्षांतर्गत असंतोष मात्र कायम राहिल्याचे समजते; काही नेते तर प्रचार मोहिमेपासूनही अलिप्त राहिले होते. जमीर अहमद खान यांच्या भूमिकेकडे लक्ष या मतदारसंघात मुस्लिम लोकसंख्या जास्त असल्याने तिथून मुस्लिम उमेदवार द्यावा, अशी मागणी अल्पसंख्याक कल्याण मंत्री बी.झेड. जमीर अहमद खान यांनी केली होती. या मुद्द्यावरून पक्षात काहीसा तणाव निर्माण झाला होता. खान यांच्या विरोधात काही अहवाल प्राप्त झाला आहे का, असे विचारले असता शिवकुमार यांनी “अद्याप कोणतीही माहिती नाही,” असे म्हणत सावध पवित्रा घेतला. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी खान यांना चर्चेसाठी बोलावले होते, या भेटीनंतर काय घडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (D K Shivakumar)