PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजगार मेळाव्याअंतर्गत 71,000 जणांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नियुक्ती पत्रांचे वाटप केले. सरकारच्या धोरण आणि कार्यक्रमांच्या केंद्रस्थानी तरुण लोकसंख्या आहे आणि भरती प्रक्रियेत प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असल्याचे मोदींनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, देशाला पुढे नेण्यासाठी तरुण कलागुणांची क्षमता वाढवणे आवश्यक आहे. ही जबाबदारी देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर आहे, म्हणूनच अनेक दशकांपासून देशाला नवीन भारत घडवण्यासाठी आधुनिक शिक्षण पद्धतीची गरज भासत होती. दीड वर्षात दहा लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या दिल्या पंतप्रधान म्हणाले की, “गेल्या दीड वर्षात सुमारे दहा लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. हा स्वतःच एक विक्रम आहे. आज भारतातील तरुण नवीन आत्मविश्वासाने भरलेले आहेत. प्रत्येक क्षेत्रात तो आपला झेंडा फडकवत आहे. भारतातील तरुणांच्या क्षमता आणि प्रतिभेचा पूर्ण वापर करणे हे आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे देश आता त्या दिशेने वाटचाल करत आहे. ” “यापूर्वी विविध निर्बंधांमुळे अनेकदा शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांवर ओझे बनत होती, मात्र आता त्यांना नवे पर्याय दिले जात आहेत. पूर्वी ग्रामीण, दलित, मागासलेल्या आणि आदिवासी समुदायाच्या तरुणांसाठी भाषा ही मोठी समस्या होती. मात्र आम्ही मातृभाषेतून शिकवायचे आणि त्यातच परीक्षा घेण्याचे धोरण सुरू केले. आमचे सरकार तरुणांना 13 वेगवेगळ्या भाषांमध्ये भरती परीक्षा देण्याचा पर्याय देत आहे,” असेही त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, “भारताने 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचे वचन दिले आहे. हे उद्दिष्ट साध्य केले जाईल हा आम्हाला विश्वास आहे. आज भारतातील तरुण नव्या आत्मविश्वासाने भरलेला आहे आणि प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा फडकवत आहे.” दरम्यान, सीमाभागातील तरुणांना कायमस्वरूपी शासकीय नोकऱ्या देण्यासाठी आज विशेष भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात आतापर्यंत 50 हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रे मिळाले आहेत. हेही वाचा: दादा भुसेंकडून दीपक केसरकारांना आणखी एक धक्का ; शालेय गणवेशानंतर आता ‘हा’ निर्णय बदलणार ?