‘वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न धनंजय मुंडेंनी…’; कासलेंचा गौप्यस्फोट; पोलिसांनाही दिले चॅलेंज

Walmik Karad | सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सध्या तुरुंगात असलेला आरोपी वाल्मिक कराड याच्या बाबत एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याने खळबळजनक दावा केला आहे. वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर होती, असा दावा पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केला. यातच आता कासले यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर केलाआहे. ज्यात त्यांनी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
“काल मी वाल्मीक कराड याच्या संदर्भात मी माझ मत मांडलं. तर माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला, मी काल मुलाखतीमध्ये सांगितले की काहीतरी लपवण्यासाठी हे केलं. एन्काऊंटर कुणी करण्यासाठी ऑफर दिली होती, त्यांच मी आज नाव सांगतो. ते म्हणजे धनंजय मुंडे आहेत. धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराडचा एन्काऊंटरचा प्रयत्न केला होता. कारण त्यांना ते नको होते. वाल्मिक कराड त्यांचे अंडी पिल्ली बाहेर काढणार होते. त्यामुळे ते खुनाचा आरोपात सहआरोपी झाले असते,” असा दावा निलंबित पीएसआय अधिकारी रणजित कासले यांनी केला आहे.
पोलिसांनी मला पकडून दाखवावं; कासलेंचे ओपन चॅलेंज
“धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे. संतोष देशमुख प्रकरणात अनेक पुरावे दाबले गेले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे सहआरोपी होणार नाहीत,” असा दावाही रणजीत कासले यांनी केला आहे. याशिवाय कासले यांनी व्हिडिओच्या शेवटी महाराष्ट्र पोलिसांना चॅलेंजही दिले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी मला पकडून दाखवावे. मी त्यांना ओपन चॅलेंज देतो. त्यांनी कितीही टीम पाठवू द्या. मी रोज स्टेट बदलणार, सीम कार्ड बदलणार,” असंही कासले म्हणाले.
आधीच्या व्हिडिओत काय?
परळी नगर परिषदेचे गटनेते म्हणून कार्यरत राहिलेल्या वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची सुपारी मला देण्यात आली होती, असं कासलेने याआधी म्हटलं आहे. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी 5 कोटी, 10 कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिल्याचं रणजीत कासले म्हणाले. कासले यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत हा धक्कादायक दावा केला आहे. एवढेच नाहीतर “राज्यातील अनेक एन्काऊंटर बोगस होते”, असा दावा देखील कासले यांनी केला आहे.
“मी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची बातमी पाहिली. या ५ पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि एसआयटी बसवा असं कोर्टाने म्हटलं. एसआयटी बसवून काही उपयोग होणार नाही. जर चौकशी करायची असेलच तर केंद्राची यंत्रणा बसवा, मग त्यातून सत्य बाहेर पडेल. फेक एन्काऊंटर कसे होतात हे मी सांगतो,” असाही आरोप रणजित कासलेंनी केला होता.
हेही वाचा:
रॉबर्ट वढेरा यांना ईडीचे समन्स ; चौकशीसाठी निघाले चालत, म्हणाले,” माझ्यावर दबाव…”





