Devendra Fadnavis : “पोलिसांनी मोठा संयम दाखवला…”; दिल्लीत आंदोलकांवर लाठीमार केल्यानंतर मुख्यमंत्री फडणविसांची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis : काही लोक आपला अजेंडा घेऊन या आंदोलनात शिरले, फडणविसांचा विरोधकांवर निशाणा

Devendra Fadnavis : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत काल हजारोंच्या संख्येने दिल्लीत कॅाकरोच जनता पार्टीच्या समर्थकांनी संसदेकडे धाव घेतली. यादरम्यान, आंदोलकांना रोखताना पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या सर्व घडामोडींवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ? (Devendra Fadnavis)
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण आंदोलन करताना संविधानाने दिलेले हक्क आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतीपूर्ण आंदोलन करत असेल तर त्याला परवानगी दिली जाईल. मात्र, जाणीवपूर्वक राजकीय अशांतता तयार करण्यासाठी विनापरवानगी आंदोलन करणे, हिंसा करणे, हे कुठल्याही परिस्थितीत योग्य नाही, त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
‘पोलिसांच्या गाड्या उलटवणे, फोडणे, पोलिसांवर दगडफेक अशा अनेक गोष्टी घडल्या’
पुढे ते म्हणाले, “दिल्लीत आंदोलन झाले, त्यामध्ये अनेक राजकीय पक्ष आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करत आहेत. अनेक संघटना, ज्यांचं या विषयाशी घेणेदेणे नाही, ते अराजकता निर्माण कशी होईल, त्याचे प्रयत्न करत आहेत. ज्यावेळी फेसलेस आंदोलन असतं, दिल्लीत नेतृत्त्वहीन व्यवस्था पाहायला मिळाली. पोलिसांच्या गाड्या उलटवणे, फोडणे असेल, पोलिसांवर दगडफेक असेल, अशा अनेक गोष्टी घडल्या. दिल्लीत सुरु असलेले विद्यार्थी आंदोलन चेहरा नसलेले आहे. त्यामुळे या आंदोलनात काही लोक वेगळा अजेंडा घेऊन घुसले आहेत.”
“कोणत्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करणं कधीच आवडत नाही. पण काल ज्याप्रकारची अवस्था होती, जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या. पोलिसांनी मोठा संयमही दाखवला आहे.”
“कुठलंही आंदोलन आपण बघितलं फेसलेस असतं आंदोलन तेव्हा काही प्रवृत्ती त्यामध्ये शिरत असतात. त्या प्रवृत्ती आंदोलनाचा फायदा घेऊन, आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला स्वार्थ कसा पूर्ण करता येईल, असा प्रयत्न करत असतात. यापैकी अनेकांना नीट परीक्षा काय आहे, परीक्षा कधी झाली, हे माहिती नाही. ते ते आपला अजेंडा रेटत आहेत. सगळे काही एका विचाराने तिथे एकत्र आलेले नाहीत,” अशी टीका देखील फडणविसांनी विरोधकांवर केला आहे.
‘आंदोलनात काही असे लोक घुसलेत ज्यांना आपला स्वार्थ साधायचा’
“मी सगळ्याच आंदोलकांवर आरोप करु इच्छित नाही. या आंदोलनात काही लोक चांगल्या भावनेने सहभागी झाले असतील. पण निश्चितच या आंदोलनात काही असे लोक घुसलेत ज्यांना आपला स्वार्थ साधायचा आहे. या आंदोलनात काही हौशे-नवशे, गौशे आपला अजेंडा पूर्ण करत आहेत. ज्यांचं नीट परीक्षेशी काही देणघेण नाही, केवळ अराजकता निर्माण करायची आहे, असे लोक आपला अजेंडा घेऊन या आंदोलनात शिरले आहेत. तसेच ज्या राजकीय पक्षांना त्या त्या राज्यात रिजेक्ट केले आहे, ते यातून आपल्याला पुन्हा काहीतरी मिळवता येईल का?” असा प्रयत्न करत आहेत, असा टोलाही त्यांनी विरोधकांनी लगावला.
दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करत आहे. 20 जुलै रोजी पक्षाने संसदेकडे मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप सीजेपीने केला आहे. दुसरीकडे, आंदोलकांकडून पोलिसांवर हल्ला आणि हिंसाचार झाल्याचा दावा करत दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे.
हेही वाचा :
CJP protest: हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय ; CJP आंदोलनप्रकरणी 5 गुन्हे दाखल






