कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी जिनसेन मठाची माधुरी उर्फ महादेवी हत्ती परत करा या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्यामध्ये जनतेच्या तीव्र जनभावना लक्षात आल्या आहेत. यामुळे राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले. नांदणी येथून महादेवी हत्ती नेत असताना जमावाकडून दगडफेक झाली. या प्रकरणी पोलिसांनी धरपकड चालवली आहे. या प्रकरणातील संशयितावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी आमदार राहुल आवडी यांनी केली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले. नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्ती संदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबई येथे तातडीची बैठक बोलविली होती. यावेळी फडणवीस यांनी ही भूमिका मांडली. राज्य सरकारने आज बैठक घेऊन सकारात्मकता दाखविली असली तरीही जोपर्यंत माधुरी हत्ती नांदणी मठात परत येणार नाही, तोपर्यंत अंबानी उद्योग समुहाच्या सर्व गोष्टीवर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यात सुरू करणार असल्याचे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सांगितले. तो हत्ती आहे की नाही? बैठकीत पेटा संस्थेने आर्थिक अमिष दाखवून वनतारा येथे पाळीव हत्ती देण्याची सुपारी घेतली आहे, असा आरोप करून बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि, महाराष्ट्र सरकारने ज्या हत्ती वनतारा येथे पाठविण्यात आले आहेत. त्यांची सध्या काय परिस्थती आहे, याबाबत कोणतीही तपासणी राज्य सरकारने केलेली नाही. विटा येथील श्री नाथ मठाचा हत्ती २०२३ साली वनतारा येथे घेऊन गेले आहेत. आज तो हत्ती तिथे आहे कि नाही याबाबत संशय निर्माण झालेला आहे.