Devendra Fadnavis : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती चर्चा सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अजित पवार हे भाजपशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा निर्णय करतील का? असा प्रश्न विचारला आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची तारीख ठरली असती तर आम्हाला सांगितले असते, असेही ते म्हणाले. तसेच राष्ट्रवादीने विलिनीकरणाचा निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी आग्रही होते, आणि 12 फेब्रुवारीला ते जाहीर करणार होते, असा दावा शरद पवार यांच्या पक्षाकडून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, समजा अजित पवार जर राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाचा निर्णय घेत असतील तर ते भाजपशी चर्चा केल्याशिवाय घेतील का? चर्चा अंतिम स्टेजला गेली असती, तारीख ठरली असती तर त्यांनी आम्हाला सांगितले असते. अशा प्रकारच्या कोणत्याही तारखेची आम्हाला माहिती नाही. राष्ट्रवादीने असा कोणताही निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी. अजित पवार अशी चर्चा करीत असतील तर ते सरकार मधून बाहेर पडण्यासाठी करत होते का? मी अनेक गोष्टी सांगू शकतो, पण मला यावर बोलायचे नाही. अजित पवार आणि मी दोन तास बोलत बसलो होतो, तशी कोणतीही माहिती मला त्यांनी दिली नाही. अजित पवार यांच्या पक्षाने निर्णय घेतला, सुनेत्रा ताईंनी नेतृत्व करावे त्यांचा निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या निर्णयासोबत उभे राहणे हे आमचं काम आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. देवेंद्र फडणीसांनी केलेल्या वक्तव्यावर शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया देत ते म्हणाले की, अजित पवारांची शपथ घेऊन सांगतो, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती, 12 तारखेला बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार होता.