Devendra Fadnavis : “मी बोल बच्चन भैरवींना उत्तर देत नाही”; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंच्या टीकेवर पलटवार

जळगाव : उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर टीका केली होती. मराठी माणसांची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकांचे नोकर भेटीगाठी घेत आहेत, असे ते म्हणाले होते. फडणवीस यांनी शुक्रवारी जळगाव येथे त्यांच्यावर पलटवार करताना मी बोल बच्चन भैरवींना उत्तर देत नाही, असा उपरोधिक पलटवार केला.
काहीही झाले तरी मुंबई पुन्हा एकदा आमच्या ताब्यात येणारच आहे. मुंबई मराठी माणसांच्या ताब्यात गेली तर यांच्या मालकांचे कसे होणार? मालकाच्या मित्राचे कसे होणार? म्हणून मराठी माणसांची शक्ती एकवटता कामा नये म्हणून शेठजीचे काही नोकर प्रयत्न करत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. पत्रकारांनी शुक्रवारी याविषयी फडणवीस यांना छेडले असता त्यांनी केवळ एका वाक्यात या प्रश्नाला उत्तर दिले. मी बोल बच्चन भैरवींना उत्तर देत नाही, असे ते उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले.
दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज जळगावमध्ये खाज्याजी नाईक स्मारकाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना त्यांनी जनतेला फूट पाडणाऱ्यांपासून सावधान राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, समाजात विशेषतः जनजातीय क्षेत्रात काही लोक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोक खोट्या गोष्टी सांगून आमच्या जनजातीय बंधू भगिनींना इतर लोकांपासून वेगळे कसे करता येईल याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपल्या पूर्वजांचा लढा लक्षात ठेवून आपण सावध राहिले पाहिजे. एकजूट राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा जोरदार समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आरोप करणे सोपे आहे. पण हे नेते जेव्हा देशभर, राज्यभर दौरे करत होते, तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीतून ऑनलाइन भाषण करत होते. हे महाराष्ट्रातील जनतेने बघितलेले आहे. सध्या ते शिव आणि हिंदुत्व हे दोन आधारस्तंभ सोडून सोनिया गांधींच्या चरणी नतमस्तक झालेत, असे बावनकुळे यांनी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.





