Devendra Fadnavis | रामोशी, बेडर समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रभात वृत्तसेवा
गराडे – इंग्रजांविरुद्ध पहिली ठिणगी पेटवणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हे खर्या अर्थाने क्रांतिकारक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणेच त्यांनी गनिमी काव्याने ब्रिटिशांना धडा शिकवला. समाजाच्या शौर्याची परंपरा आजही जिवंत असून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भिवडी (ता. पुरंदर) येथे आयोजित राजे उमाजी नाईक यांच्या 234 व्या जयंती सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार विजय शिवतारे, गोपीचंद पडळकर, राहुल कुल, विक्रम पाचपुते, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार संजय जगताप, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, रामोशी-बेडर समाजाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले आहे. या महामंडळामार्फत समाजातील घटकांना दोन लाख रुपयांपर्यंतचे बिगर तारण कर्ज, तसेच उद्योजक व व्यावसायिक घडावेत यासाठी 15 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. याशिवाय पोलीस भरतीसाठी विशेष योजना, तसेच शिक्षण-प्रशिक्षणासाठी महाज्योती व सारथीमार्फत योजना राबविण्यात येणार आहेत.
कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते स्व. गिरीश बापट, स्व. बाबुराव पाचर्णे, स्व. रामभाऊ जाधव, स्व. सुनील चव्हाण यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार, तर बाबुराव जमादार, छगन जाधव व बाबुराव चव्हाण यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी रामोशी समाजाच्या इतिहासावर आधारित माहितीपटाचेही सादरीकरण झाले.
आमदार पडळकर यांनी आपल्या मनोगतात पुरंदर येथे राजे उमाजी नाईक यांचे पाच एकर जागेत स्मारक उभारले जाणार असल्याचे जाहीर केले. तर शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारामुळेच ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय व महाज्योतीसारख्या योजना कार्यान्वित झाल्याचे सांगितले.कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजे उमाजी नाईक स्मृतीस्थळास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली तसेच राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या कक्षाला भेट देऊन त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
सर्व जातींना मुख्य प्रवाहात आणणार
ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय, महाज्योती आणि विविध महामंडळे स्थापन केली आहेत. विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती, 42 वसतीगृह आणि विविध प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्य उभारले, त्यांचे शिवकार्य पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व जातींना मुख्य प्रवाहात आणणे हेच शासनाचे ध्येय आहे.





