Isha Keskar : डोळ्यावर फोड आला, 10 तास झोप गरजेची होती; ईशा केसकरने सांगितलं अचानक मालिका सोडण्याचं कारण
Isha Keskar : आता तिने पहिल्यांदाच या निर्णयामागे नेमकं काय कारण होतं यावर सविस्तर भाष्य केलं आहे.

Isha Keskar : स्टार प्रवाहवरील ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. टीआरपीमध्येही अव्वल स्थानी असलेल्या या मालिकेला मोठा धक्का बसला तो प्रमुख अभिनेत्री ईशा केसकरने अचानक मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर. विशेष म्हणजे, तिच्या एक्झिटनंतर अवघ्या महिनाभरात मालिकेलाही निरोप द्यावा लागला.
याआधीही ईशाने एका मालिकेतून मधेच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता तिने पहिल्यांदाच या निर्णयामागे नेमकं काय कारण होतं यावर सविस्तर भाष्य केलं आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशा म्हणाली की, मालिकांमधील सलग १४ ते १६ तासांचे शूटिंग, त्यासोबतच सततचं कामाचं दडपण आणि कामाचं वातावरण याचा तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ लागला होता.
मला आधीच सांगितलं होतं की…
“मी तरुण आहे, माझ्या आहाराची, झोपेची आणि फिटनेसची काळजी घेते. तरीही दररोज इतके तास शूटिंग करणं शरीरासाठी सोपं नसतं. हळूहळू मला वाटू लागलं की, मी या पद्धतीच्या कामासाठी बनलेली नाही. अनेक ज्येष्ठ कलाकारांनीही मला आधीच सांगितलं होतं की, मालिकांचं विश्व आकर्षक आणि आर्थिकदृष्ट्या चांगलं असलं तरी त्याची मोठी किंमत मोजावी लागते.” असा खुलासा ईशाने केला.
…पण दुर्दैवाने तसं घडलं नाही.
ईशाने स्पष्ट केलं की, मालिकेदरम्यान तिच्यासोबत कोणताही वाईट अनुभव आला नाही. “मालिका, निर्माते आणि वाहिनी यांच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही नाराजी नाही. मात्र, मला स्वतःसाठी आणि माझ्या तब्येतीसाठी वेळ हवा होता. आमच्यासमोर अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यातून कोणालाच योग्य तो मार्ग काढता आला नाही. मलाही वाटत होतं की काहीतरी तोडगा निघेल, पण दुर्दैवाने तसं घडलं नाही,” असं तिने सांगितलं.
मालिका सोडण्याचा निर्णय अचानक घ्यावा लागला. याविषयी ईशा म्हणाली, “पुढचा विचार करण्यासाठीही माझ्या शरीराने मला वेळ दिला नाही. माझ्या डोळ्यावर फोड आला होता आणि तो बरा होण्यासाठी पुरेशी झोप व विश्रांती आवश्यक होती. त्यावेळी दिवसाला किमान दहा तास झोप आणि शरीराला आवश्यक तेवढं पाणी मिळणं गरजेचं होतं.”
प्रेक्षक आणि काही कलाकारही टोमणे मारतात : ईशा केसकरने व्यक्त केली खंत
ईशाच्या मते, यापूर्वीच्या मालिकेत तिच्यासोबत दुसरी मुख्य अभिनेत्री असल्यामुळे कामाचा ताण होता. मात्र, ‘लक्ष्मीच्या पावलांनी’मध्ये जवळपास सर्व जबाबदारी तिच्यावरच होती. “एक वर्ष मी हे काम आनंदाने केलं. पण पुढे कामाचा ताण खूप वाढला. अशा परिस्थितीत माझं आणि मालिकेचं दोघांचंही नुकसान होण्यापेक्षा योग्य वेळी बाजूला होणं मला योग्य वाटलं. त्यामुळे मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता ‘ईशा मालिका सोडते’ अशीच माझी प्रतिमा तयार झाली आहे. यावरून प्रेक्षक आणि काही कलाकारही टोमणे मारतात.” अशी खंतही तिने व्यक्त केली.





