दिल्ली हिंसाचाराचा तपास गुन्हे शाखेकडे

दोन एसआयटी स्थापन; मृतांची संख्या 37 वर
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी देशाच्या राजधानीतील हिंसाचाराचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. त्याशिवाय, तपासाला गती देण्यासाठी दोन विशेष तपास पथकांची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, दिल्ली हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 37 इतकी झाली आहे.
दिल्ली रविवारपासून सलग तीन दिवस हिंसाचारामुळे धुमसली. त्या हिंसाचारात सुमारे 200 जण जखमी झाले. त्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 48 गुन्हे दाखल केले आहेत. हिंसाचाराची धग प्रामुख्याने ईशान्य दिल्लीत जाणवली. मागील दोन दिवसांपासून हिंसाचार आटोक्यात आला आहे. मात्र, आधीच्या हिंसक घटनांची तीव्रता अजूनही जाणवत आहे. त्यामुळे ईशान्य दिल्लीत तणावपूर्ण शांतता पसरली आहे.
बहुतांश दुकाने अजूनही उघडलेली नाहीत. त्याशिवाय, स्थानिक रहिवासी घरांमध्येच राहणे पसंत करत आहेत. त्यामुळे ईशान्य दिल्लीतील जनजीवन अजून सुरळित झाले नसल्याचे चित्र आहे. हिंसाचारग्रस्त भागांमध्ये मोठ्या संख्येने पोलीस आणि सुरक्षा जवान तैनात आहेत. त्यामुळे बुधवारी आणि गुरूवारी हिंसाचाराची मोठी घटना घडली नाही. त्यामुळे स्थानिकांबरोबरच सुरक्षा यंत्रणांनाही दिलासा मिळाला.





