नवी दिल्ली : बिहार काँग्रेसच्या आयटी सेलने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आई हीराबेन यांच्यासारखे दिसणारे पात्र असलेला एक एआय-निर्मित “डीपफेक” व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तक्रारीवरून नॉर्थ एव्हेन्यू पोलिस ठाण्यात काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या आयटी सेलविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या व्हिडिओमुळे पंतप्रधानांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न झाला असून, तो कायदा, नैतिकता आणि महिलांच्या सन्मानाचा भंग करणारा आहे, असा आरोप भाजपने केला आहे. बिहार काँग्रेसने शेअर केला होता व्हिडिओ – दिनांक १० सप्टेंबर रोजी बिहार काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर हा एआय-निर्मित व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आई हीराबेन यांच्यासारखे दिसणारे पात्र दाखवण्यात आले होते. भाजपने यावर तीव्र आक्षेप नोंदवताना हा व्हिडिओ “घृणास्पद” असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओमुळे केवळ पंतप्रधानांच्या आईचाच नव्हे, तर देशातील सर्व माता आणि भगिनींचा अपमान झाला आहे, असा दावा भाजपने केला. व्हिडिओमध्ये थेट नावांचा उल्लेख नसला, तरी त्यासोबत लिहिलेल्या हिंदी कॅप्शनचा अर्थ होता – “साहेबांच्या स्वप्नात आई येतात, रंजक संवाद पाहा.” असा आहे. व्हिडिओचा तपशील – या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींसारखे दिसणारे एक व्यक्ती झोपेची तयारी करताना दाखवले आहे. त्यानंतर त्यांच्या स्वप्नात आईसारखी दिसणारी एक महिला येते आणि राजकीय फायद्यासाठी तिच्या नावाचा वापर केल्याबद्दल त्यांना फटकारते. हा व्हिडिओ त्या घटनेच्या काही दिवसांनंतर समोर आला, जेव्हा दरभंगा येथे काँग्रेस-राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) मंचावरून राहुल गांधी यांच्या ‘मतदाता अधिकार यात्रा’ रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदींच्या आईबाबत आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या होत्या. यावर पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, बिहारची जनता काँग्रेस आणि राजदच्या अशा कृत्यांना कधीच माफ करणार नाही. भाजपची तीव्र प्रतिक्रिया भाजपने या व्हिडिओवर तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेसवर सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला आहे. पक्षाने म्हटले आहे की, अशा कृत्यांमुळे काँग्रेसने स्वतःची विश्वासार्हता गमावली आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत एफआयआर दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे, कारण यामुळे काँग्रेस आणि भाजपमधील संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो. या प्रकरणावर काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, हा वाद पुढील काही दिवसांमध्ये राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.