Arvind Kejriwal | दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला (आप) पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत आपला केवळ 22 जागांवर विजय मिळवता आला. तर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी या पराभवामुळे कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये असे म्हटले आहे. त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिपोर्टनुसार, दिल्लीतील पराभवानंतर आता शेकडो कार्यकर्ते केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत आहे. यावेळी बोलताना त्यांनी निवडणुकीत विजय-पराजय होतच असतो. आता जो कोणी भेटायला येईल त्याने हसतच यावे. तसेच, ‘देवाने सत्ता दिली आणि आता त्याची काही वेगळी इच्छा असेल. 10 वर्षांत आपण असे असे काम केले, जे इतर पक्ष 75 वर्षांतही करू शकले नाहीत. पण यावेळी देवाची इच्छा काहीतरी वेगळी होती. त्याने आता एवढेच होते असे म्हटले आहे’, असे केजरीवाल म्हणाले. अरविंद केजरीवाल यांनी पत्नी सुनीता यांच्यासोबत बसून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर होत आहे. यामध्ये केजरीवाल बोलताना दिसत आहेत की, ‘सर्वांनी ही निवडणूक खूप चांगल्या पद्धतीने लढवली, आपण कुठेही कमी पडलो नाही कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या गेल्या, भीती दाखवली गेली, प्रलोभने देण्यात आली, पण ते कुठेही ढळले नाहीत.’ तसेच, यावेळी त्यांनी पराभवामुळे कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये, असे म्हटले. केजरीवाल म्हणाले की, जेव्हा गुंडागिरी आणि पैशाच्या जोरावर निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या जात होत्या, त्यावेळी आपण दोन निवडणुका जिंकून दाखवल्या. पुढेही जिंकून दाखवू. प्रामाणिकपणे, विना पैसा, गुंडागिरीशिवाय आणि सभ्यतेने विजय मिळवून दाखवू.” तसेच, यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांनी लोकांची मदत करणे सुरूच ठेवावे, असेही सांगितले. ते म्हणाले की, ‘सत्ता नसली तरीही जसे शक्य होईल तसे मदत करत जा. शाळेत प्रवेश मिळवून द्यायचा असेल, अथवा कोणाला रुग्णालयात भरती करायचे असेल, नेहमी मदत करत राहा.’ याशिवाय, ‘आता पंजाबकडे लक्ष द्यावे लागणार आहे. सर्वांना पंजाबमध्ये घेऊन जाईन.’, असे म्हणत त्यांनी पंजाबकडे विशेष लक्ष देणार असल्याचेही स्पष्ट केले.