Dehu News – तीर्थक्षेत्र देहू परिसरात नगरपंचायतीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होणे, विजेच्या दाबातील चढ-उतारामुळे मोटार जळणे तसेच विविध तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठा वारंवार खंडित होत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या संत तुकाराम महाराज बीज सोहळा निमित्त मोठ्या संख्येने भाविक वारकरी देहूत दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभाग कडून धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. सध्या इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असली तरी गेल्या पाच दिवसांपासून देहूतील पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. इंद्रायणी नदीकिनारी बोडकेवाडी येथे असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात विविध यांत्रिक व तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने शहराला पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याचे सांगितले जात आहे. सोहळा संपल्यानंतरही अद्याप पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नदीत पाणी मुबलक असतानाही पाणीटंचाई भासत असल्याने “नदी उशाशी आणि कोरड घशाशी” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जलशुद्धीकरण केंद्रातील सॅन्ड फिल्टरमधील वाळू गेल्या १५ वर्षांपासून बदललेली नसल्याने ती जुनी झाली आहे. त्यामुळे पाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात अडचणी येत आहेत. परिणामी सध्या नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. आणखी पंधरा दिवस टंचाई देहू नगरपंचायतीचे पाणीपुरवठा अधिकारी धनंजय नायकवडे यांनी सांगितले की, सॅन्ड फिल्टरसाठी वाळूचा ठेका देण्यात आला असून ती उपलब्ध होताच तो बदलण्यात येईल. त्यानंतर पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागेल. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असतानाही देहू नगरपंचायत हद्दीत वारंवार खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे “नदी उशाशी आणि कोरड घशाशी” अशी परिस्थिती देहूकरांवर ओढवली असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. सध्या सॅंड फिल्टरचे काम सुरू असून आणखी काही दिवस पाणी टंचाई त्रास सहन करावा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.