Deepika Padukone Farah Khan: बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शिका-नृत्यदिग्दर्शक फराह खान यांच्यात आता मतभेद निर्माण झाले का, असा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे. कारण दोघींनीही एकमेकींना इंस्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे. एवढेच नव्हे, तर फराह खान यांनी दीपिकाचा पती रणवीर सिंगलाही अनफॉलो केले आहे. रणवीर मात्र अजूनही फराह खान यांना फॉलो करत आहेत. सुरुवात ‘ओम शांती ओम’पासून फराह खान यांनी २००७ साली आलेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून दीपिकाला बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. या चित्रपटानंतर दोघींमध्ये उत्तम मैत्रीचे नाते असल्याचे अनेकदा दिसून आले. कार्यक्रम असो वा मुलाखती, दोघी एकमेकींच्या जवळ असल्याचे नेहमी जाणवत होते. पण आता अचानक घडलेल्या या ‘अनफॉलो’ प्रकरणामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम आणि चर्चांना उधाण आले आहे. ८ तासांच्या शिफ्टवरून वाद? अलीकडेच दीपिका पादुकोण हिने कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी ‘फक्त ८ तासांची शिफ्ट असावी’ अशी मागणी केली होती. बॉलिवूडमध्ये सलग १२-१६ तास काम करावे लागते, हे सर्वश्रुत आहे. या पार्श्वभूमीवर दीपिकेची मागणी योग्य असल्याचे अनेकांना वाटले. मात्र, फराह खान यांना हे पटलेले दिसत नाही. एका व्लॉगमध्ये फराह खान यांनी अभिनेत्री राधिका मदानला तिच्या पहिल्या ऑडिशनविषयी विचारले. तेव्हा राधिकाने सांगितले की तिला ४८ ते ५६ तास सलग शूट करावे लागले होते. त्यावर फराह खान म्हणाल्या, “तुझी शिफ्ट आठ तासांची नव्हती ना? आम्ही सगळ्यांनी असेच तासन्तास काम केले आहे. अशा तपश्चर्येतूनच कलाकार तयार होतात. सोने तापल्यावरच शुद्ध होते.” दीपिकाबद्दलची चिडचिड याच व्लॉगमध्ये जेव्हा होस्टने फराह खान यांना विचारले की “दीपिका पादुकोण आमच्या शोमध्ये कधी येणार?” तेव्हा फराह यांनी चुटकी घेत चिडचिडे उत्तर दिले, “दीपिका आता फक्त आठ तास शूट करते. तिला तुमच्या शोवर येण्यासाठी वेळ नाही. जिस दिन तू गाव जाएगा, उस दिन वो आएगी.” त्यामुळे फराह यांच्या बोलण्यातून दीपिकेबद्दल नाराजी असल्याचे स्पष्ट जाणवले. चाहत्यांमध्ये गोंधळ फराह खान यांच्या या वक्तव्यांनंतर आणि आता झालेल्या इंस्टाग्रामवरील ‘अनफॉलो’ प्रकरणामुळे चाहत्यांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत.खरोखरच दोघींच्या नात्यात दुरावा आला आहे का? की हे फक्त तात्पुरते मतभेद आहेत? अनेक चाहते सोशल मीडियावर लिहित आहेत की, “ज्यांनी दीपिकाला पहिली संधी दिली, त्यांच्यात एवढा दुरावा कसा निर्माण होऊ शकतो?” तर काही चाहत्यांचे म्हणणे आहे की हा प्रकार फक्त गैरसमजामुळे झाला असावा. अधिकृत प्रतिक्रिया नाही सध्या तरी ना दीपिका पादुकोण, ना फराह खान, कोणाकडूनही याबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या सर्व चर्चांचा आधार फक्त सोशल मीडियावरील घडामोडी आणि काही व्लॉगमधील विधानांवरच आहे.