सिंधुदुर्ग : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तसेच अनेक राजकीय घटना घडताना दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेतून दीपक केसरकर यांनी यापुढे माझ्या घरातील कोणीही राजकारणात येणार नाही, अशी घोषणा केली. काय म्हणाले दीपक केसरकर? देशात चुकीची परंपरा झाली. खोटं बोलून नेरेटीव्ह सेट केला जात आहे. गेल्या 15 वर्षात मी काय काम केलं यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. मी गेल्या 5 वर्षात 2500 कोटी रुपयांचा निधी आणला. उद्धव ठाकरे सावंतवाडीत येऊन काय बोलतात, साईबाबांबद्दल बोलतात. मात्र साईबाबांनी आशीर्वाद दिले म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा उद्धव ठाकरे केव्हाच मुख्यमंत्री झाले नसते, अशी टिका दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली. उद्धव ठाकरे यांना मराठीचा अभिमान होता, तर मराठी संवर्धन करायची कार्यालये मुंबईच्या बाहेर का गेली? ती सर्व कार्यालये मी पुन्हा मी मुंबईमध्ये आणली. यापुढे माझ्या घरातील कोणीही राजकारणात येणार नाही, अशी घोषणा यावेळी दीपक केसरकर यांनी केली.