ठरलं! उद्या बंदऐवजी आंदोलन; ‘मविआ’च्या तिन्ही नेत्यांनी स्पष्ट केली भूमिका, उद्धव ठाकरे म्हणाले…

Maharashtra Bandh : राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने उद्या शनिवारी (दि. 24 ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने या बंदला परवानगी नाकारली तसेच “कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी”, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
हायकोर्टाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपापली भूमिका स्पष्ट केली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वात आधी राष्ट्रवादी (एसपी) पक्षाचे शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ट्विट करुन शरद पवार म्हणाले, “बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या (दि. २४ ऑगस्ट) रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.
हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते.”
यानंतर काही वेळात काॅंग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले, “उद्या महाराष्ट्र बंद करणार नाही मात्र सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत 1 तास काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात येणार आहे. आम्ही बंद करणार नाही मात्र जर कोणी स्वत: आपली दुकाने बंद ठेवली तर त्याला आमचा विरोध नाही. ”
तर सायंकाळी 7 वाजता शिवसेना (उबाठा) पक्षाचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका जाहीर केली. ठाकरे म्हणाले, “न्यायालयाने इतक्या तत्परतेने निर्णय घेतला तसा बदलापूर घटनेतील आरोपीला शिक्षा देण्यासाठीही घ्यावा. आम्ही बंद करण्याचं आवाहन केलं होतं दगडफेक करण्याचं नाही, लोकांनी आपल्या भावना व्यक्त करायच्या नाहीत का? असा सवालही त्यांनी केला. तसेच उद्या 11 वाजता शिवसेना भवनाच्या चौकात बसणार, तोंडाला काळी फित बांधून आंदोलन करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उद्या महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बंद न करता आंदोलन करणार आहेत. शरद पवार उद्या पुण्यात बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन करणार आहेत. काॅंग्रेसचे विजय वडेट्टीवार नागपूरात आंदोलन करणार आहेत. तर उद्धव ठाकरे शिवसेना भवन चौकात आंदोलन करणार आहेत. दरम्यान राज्यभरात उद्या महाविकास आघाडीचे कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन आंदोलन करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
याचिकाकर्त्यांनी न्यायालयात हा युक्तिवाद केला –
न्यायालयात युक्तीवाद करताना वकील सुभाष झा म्हणाले, या बंदमुळे जनजीवन विस्कळीत होणार आहे. सर्वसामान्य जनतेला त्रास होणार आहे. राजकीय पक्षांनी पुकारलेले बंद असंवैधानिक ठरवण्याचा हायकोर्टाला अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा संदर्भ देत युक्तिवाद केला. सरकार असे बेकायदेशीर बंद रोखत नसेल तर कोर्टानं हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करणाऱ्या लोकांविरोधात सरकारने प्रतिबंधक पावले उचलली पाहिजेत.
कोणालाही सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करण्याचा अधिकार नाही. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारने पार पाडलीच पाहिजे. कोणतंही विरोध प्रदर्शन हे कायदेशीरच मानलं पाहिजे. बदलापुरातील ज्या घटनेसाठी विरोध होतोय तो योग्यच आहे. दोन लहान मुलींच्या बाबतीत जे काही घडलं त्यासाठी आरोपीला फाशीच झाली पाहिजे. पण त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचंय, त्यासाठी संपूर्ण राज्याला वेठीस धरणं चुकीचं आहे.
अॅड गुणरत्न सदावर्ते न्यायालयात युक्तीवादादरम्यान म्हणाले, पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. दोषी पोलिसांवर सरकारनं कारवाई केली आहे. राज्य सरकारनं SIT स्थापन केली आहे. मग हा बंद कशाला? बदलापूर स्थानकावर झालेल्या दगडफेक घटनेचे, फोटो सदावर्ते यांनी हायकोर्टात सादर केले. अश्या प्रकारच्या दगडफेकीचे समर्थन कसं करणार? असा सवाल सदावर्तेंनी केला.




