Dattatray Bharne – उजनी धरण हे पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या अर्थकारणाचा कणा आहे. उजनीतील मच्छिमारांच्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, जिल्हा नियोजन मंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेतून मत्स्यबीज सोडण्यासाठी यंदा २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पळसदेव येथे दिली. उजनी जलाशयात मत्स्यबीज संचयन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त अर्चना शिंदे, बीएनएचएसचे शास्त्रज्ञ डॉ. उन्मेष काटवटे, प्रताप पाटील, हनुमंत कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा जाधव, पंचायत समिती सदस्य कीर्ती काळे, सचिन सपकळ, प्रवीण काळे, सुजित मोरे, संतोष काळे, सुभाष बनसुडे आदी मान्यवर उपस्थित होते. सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत मच्छिमारांमध्ये असलेल्या भीतीवर भाष्य करताना भरणे म्हणाले की, उजनीत सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करणे इतके सोपे नाही. यामुळे मासेमारी व्यवसायावर गदा येऊ शकते. मी मच्छिमारांचे संसार उघड्यावर पडू देणार नाही, त्यांच्या हक्कासाठी मी कायम सोबत राहीन. तसेच, आता अजितदादा नसले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी मच्छिमारांचे प्रश्न निश्चित मार्गी लावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले की, उजनीत मोठ्या प्रमाणात मत्स्यबीज सोडल्यामुळे भविष्यात मच्छिमारांना शाश्वत व्यवसाय उपलब्ध होईल. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जलाशयात मत्स्यबीज सोडून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पुणे मत्स्यव्यवसाय आयुक्त यांच्या वतीने करण्यात आले होते. उज्वला भोई, प्रांजली दरदरे, सखाराम खोत यांनी मनोगत व्यक्त केले.